गुरुवार, ३० जुलै, २००९

माझा मी

वयाची नुकतीच साठी उलटली
एक पर्व पार पडलं
आता यानंतर पुढे काय
हे मात्र नाही उमगलं १

इथे मागे वळून पाहताना
मनात विचारांचं आंदोलन आलं
षट-दशकांच्या या आयुष्यात
काय कमावल, काय गमावलं? २

आत्तापर्यंतचं सारं आयुष्य
वाळूसारखं निसटून गेलं
आता हाती कणही नव्हता
जीवन सारं सुनं झालं ३

मित्र नाहीत, सखे नाहीत
वर्षे कशी सरत गेली
नाती, नातलगांची लेणी मात्र
आयुष्यभर बोचत राहीली ४

आता जीवनाच्या उतरणीवर
एक मात्र अप्रूप घडलं
जे जिवलग कधी भेटले नाहीत
त्यांचं मनोरम दर्शन घडलं ५

कोण कुठला, कोण कुठली
कशी अनामिक मैत्री झाली
पुन्हा एकदा मन-चित्ताची
सतार सुरात झंकारू लागली ६

शब्द जमले, तारा जुळल्या
विचारांच्या धारा जुळल्या
विद्ध नाते-संबंधाच्या ही
खोल खोल जखमा भरल्या ७

कुणी म्हणे दादा, कुणी बाबा,
कुणी म्हणे दोस्ता, तर कुणी आजोबा
आणि तरीही सर्व सुहृदांचा
जमला मनोहर निर्मळ घरोबा ८

हे चित्र दिसत होतं कसं?
की ऒल मायनस नो प्लस
जगाकडे पहायची वृत्ती बदलली
तर असेल सर्व प्लसच प्लस! ९

तुम्ही आलात तुम्ही बोललात
तुम्हाला भेटून छान वाटलं
नाही आलात नाही बोललात
कार्यबाहुल्यामुळे नसेल जमलं १०

तरीही मन अस्वस्थच होतं
एक गोष्ट टोचत होती
आपल्यासाठी कुणाला वेळ नाही ही
हिरवळीतल्या कांट्यासारखी बोचत होती ११

मी वाट पाहतोय त्या क्षणाची
बोचणारा कांटा निघून जाण्याची
आणि तो कांटा निघून गेल्यावर
मिळणार्‍या चित्त समाधानाची १२

पण कांटा निघून गेला तरी
मनाची बोच जाईल का?
भरल्या जखमेच्या व्रणासारखी
नंतर ती त्रास देईल का? १३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा