रविवार, २० सप्टेंबर, २००९

आरोग्यं धनसंपदा-९

॥ आरोग्यं धनसंपदा ॥

मागल्या लेखात आपण दिनचर्या यावर पाहीले होते. त्यात काही आसने पाहिली होती. ती आसने ही विशिष्ट रोगांवर उपयोगी होती. तसेच सर्वसामान्य लोकांनाही की ज्यांना काहीही झालेलेनाही अशांनाही ती उपयोगी पडतील असे मी म्हटले होते. आज आपण आता पुन्हा दिनचर्या यावर चर्चा करू. आपण पाहत आहोत की सध्या स्वाईन फ्लूने थैमान मांडले आहे. आणि हा श्वासाशी संबंधतीत विकार आहे. आपण जर नीट लक्ष देऊन पाहिलेत तर असे लक्षात येईल की स्वाईन फ्लूने दगावलेले सर्वजण किंवा अत्यवस्थ असलेले सर्व हे श्वास अडकल्याने, श्वास कमी पडल्याने अत्यवस्थ झाले आणि दगावले. हे सर्वजण "व्हेंटीलेटर"वर होते. म्हणून आज आपण दमा किंवा अस्थमा यासंबंधी पाहूया. दमा याला आयुर्वेदात तमक श्वास असे म्हणतात. तम म्हणजे अंधार. जो विकार अंधारात आपले गुण उधळतो म्हणजेच अंधारात, रात्री अधिक त्रासदायक असतो म्हणून त्याला तमक श्वास असे नाव आहे. यात रूग्णाला श्वासाला अडथळा निर्माण होतो, श्वास अडल्यासारखे वाटते. अर्थात छातीशी संबंधीत किंवा हृदयाशी संबंधीत लागणारा दम इथे याचा इथे विचार केलेला नाही. कारण त्याच्या चिकित्सेची दिशा ही पूर्णतया निराळी आहे. याला आधुनिक वैद्यकशास्त्रात "कार्डिऍक अस्थमा" म्हणतात.


आता याची कारणे पाहू. साधारणपणे दमा हा एक ऋतू संपताना आणि दुसरा सुरू होताना होतो. थंडी पावसाळ्यात याचा जोर अधिक असतो. हवेतील आर्द्रता, ढगाळ वातावरण यात हा तीव्रतेने आढळून येतो. या शिवाय दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रदूषण. यामुळे होणार्‍या दम्याला आधुनिक वैद्यकात "ऍलर्जिक ब्राँकायटिस" म्हणतात. यात टायरचा वास, धूर, धूळ, विशिष्ट मेणाचे वास, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व विषारी वायू, कचरा पेटीतील वास आणि नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहनांच्या संख्येमुळे होणारे, वायू प्रदूषण यामुळे फुफ्फुसांच्या क्षमतेवर परीणाम होतो आणि दम लागणे, श्वास अडकणे असे त्रास सुरू होतात. ऍलर्जी असल्यानेही श्वासाचा त्रास होउ शकतो. सामान्यपणे पपई, आंबा, संत्रे, केळं, चिक्कू, पेरू,अननस, कलिंगड तसेच काकडी, टॉमेटो, फळांचे थंड रस, किंवा मिल्क शेक्सफळभाज्या फ्रीजमधले पाणी अश्या अनेक गोष्टींची ऍलर्जी होऊ शकते. म्हणून या सर्व वस्तूंचा वापर हा तारतम्याने करावा. यापैकी आपणच आपणास कशाची ऍलर्जी आहे हे पाहून त्याप्रमाणे त्या त्या वस्तूचा वापर टाळल्यास या रोगावर विजय मिळवणे शक्य आहे.


इतर कारणांत सतत गारव्यात काम करणे म्हणजे ए.सी. मधे बराच वेळ काम करून लगेचच गरम वातावरणात बाहेर येणे, जेवणानंतर दूध, फळांचा ज्युस, आईसक्रीम खाणे, वारंवार फ्रीजचे पाणी पिणे, वारंवार जेवणात फळांचा वापर करणे ही कारणे आहेत. तसेच रोजच्या जेवणात डालडा आणि रिफाईंड तेलाचा वापर हेही कारण असते. आजच्या युगात रोजच्या जेवणात डालडाचा वापर खूपच कमी असतो. पण बाहेरच्या हॉटेलमधील पदार्थात तो वापर बराच असतो. त्यामुळे नेहमी नेहमी बाहेरचे खाण्याची वेळ ज्यांच्यावर येते त्यांना हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा अतिरेकी वापर, शिळी मिठाई, शिळे अन्न तसेच अतिप्रमाणात बटाटा वांगे, अळू खाण्यानेही याचा त्रास होऊ शकतॉ. अर्थात सर्वांना त्रास होइलच असे नाही. पण ही कारणे असू शकतात हे लक्षात ठेवावे. म्हणजे आपणास कशाने त्रास होतो आहे हे समजले तर त्याप्रमाणे उपाययोजना करता येऊ शकते.



दम्याच्या लक्षणांचा विचार करायचा झाला तर त्यात वारंवार होणारी सर्दी, वेळी अवेळी तोंडातून पडणारे कफाचे बेडके, ताप, कणकण, शिंका येणे, डोकीदुखी, डोळे लाल होणे, डोळ्यातून पणी येणे अश्या लक्षणांचा समावेश आहे. तसेच इतर आण्खी लक्षणात छातीत गच्च होणे, श्वास लागणे, श्वास कमी असल्याची जाणिव होणे, छातीतून आवाज येणे अशी लक्षणे असतात. आणखी एक प्रमुख गोष्ट म्हणजे यात झोपल्यावर त्रास वाढतो, पण उठून बसल्यावर बरे वाटते. पण दमा छातीच्या विकाराने, हृदयाच्या त्रासाने असेल म्हणजेच "कार्डिऍक अस्थमा" मुळे दम लागत असेल तर मात्र झोपल्याने, विश्रांतीने बरे वाटते. शिवाय इतर किरकोळ कारणात शिंकेचा अवरोध केल्याने दम लागणे कृमी, जंत मल मूत्रप्रवृत्तीचा अवरोध यांचा समावेश आहे.


आता याच्या चिकित्सेचा विचार करूया. यात चिकित्सेच्या तीन दिशा आहेत. एक म्हणजे औषधविना चिकित्सा, घरात उपलब्ध असणारी द्रव्ये वापरून केलेली चिकित्सा आणि ग्रंथोक्त चिकित्सा. सर्वप्रथम औषधविना चिकित्सा पाहूया. यात दीर्घ श्वसन आणि प्राणायाम याचा समावेश आहे. जवळ कोणते औषध नसेल तर गरम पाणी सतत पीत राहवे. त्याने श्वासनलिका प्रसरण पावतात व फुफ्फुसातला वायू मोकळा होतो. तसेच त्रास असताना सतत लवंग चघळत राहवी. दीर्घ श्वसनात हवा हळू हळू आताघेऊन हळू हळू सोडावा. आणखी एक गोष्ट आवर्जून करावी. ती म्हणजे संध्याकाळी लवकर जेवावे. सूर्यास्ताच्या सुमारास जेवावे. संध्याकाळी ६ ते ६.३० नंतर जेवायचे नाही असा निश्चय करावा. साधी सहज उपलब्ध असणारी द्रव्ये वापरून उपचार करताना लवंग चघळावी असे मगाशी सांगितले आहेच. दूध प्यायचे असल्यास पिंपळी सिद्ध किंवा लसूण सिद्ध दूध प्यावे. ते बाधत नाही. व त्याने कफवृद्धी होत नाही. हे दूध तयार करताना एक कप दूध आणि एक कप पाणी एकत्र करावे. त्यात लहान मुलांसाठी करायचे असल्यास ३ ते ४ पिंपळ्या आणि मोठ्या माणसांसाठी १०पिंपळ्या किंवा लसणीच्या ४-५ पाकळ्या त्यात मिसळून ते मिश्रण एक कपाइतके उरवावे. त्यात चवीप्रमाणे पत्री खडीसाखर मिसळून असे दूध प्यायला हरकत नाही. इथे एक खुलासा करतो. पिंपळी आणि पिंपळ वृक्ष याचा काहीही संबंध नाही. पिंपळी हे मिरे किंवा नागवेल या कुलातले असून त्याचा वेल असतो. मिर्‍यासारखी फळे याला येतात. फरक इतकाच की मिरे साबुदाण्यासारखे गोल असतात तर पिंपळी ही लांबुळकी असते. म्हणून याला "लेंडी पिंपळी" असेही म्हणतात. पिंपळी हे निसर्गातले श्वासाच्या अवरोधावरचे सर्वोत्तम औषध आहे. अवरोध म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास कमी पडणे. त्रिकटू चूर्ण दोन चिमूट चूर्ण पाण्यात उकळून गार करून घेणे. त्रिकटू म्हणजे सुंठ, मिरे आणि पिंपळी यांचे समभाग चूर्ण असते. सहज उपल्ब्ध असणार्‍या वनस्पतीत तुळशीची १० पाने रोज चावून खावीत. कोरफडीचा गर मिरपूड लावून खावा.

आता आपण ग्रंथोक्त उपचार काय आहेत ते पाहू. यात सांगितलेली औषधे सामान्यपणे बाजारात "रेडी मेड" उपलब्ध असतील. एखादे औषध न मिळाल्यास पुण्यात शनीवार पेठेत "हरी परशुराम औषधालय" इथे मिळू शकतील. अर्थात ही औषधे घेताना तज्ञांचा सल्ला घेतल्याखेरीज वापरण्याचा विचार करू नये. तज्ञांचा सल्ला इतक्यासाठीच घ्यायचा की रूग्णाच्या अवस्थेनुसार रोगाच्या त्रासाच्या तीव्रतेनुसार त्या औषधांची मात्रा, घेण्याचे प्रमाण, व घेण्याच्या वेळा बदलतील.


ज्यावेळी वेग जास्त असेल म्हणजेच आजार अधीक तीव्र असेल तेंव्हा कनकासव १ ते २ चमचे तितक्याच पाण्याबरोबर देणे. मात्र कनकासवात धोत्रा असल्याने त्याचा वापर अगदी गरज असेल तेंव्हा करावा. खोकल्याचा त्रास कमी झाल्यावर थांबवावे. त्रास जास्त असेल तर चौसष्ट पिंपळी चूर्ण मधातून चाटवावे. साधारण हरभर्‍याच्या दाण्याइतके चूर्ण चार पांच वेळा मधातून चाटवावे. रजन्यादिवटी सतत चघळत राहणे. हा हळद, कोरफड आणि कडू जिरे याचा पाठ आहे. अगदीच "इमर्जन्सी" आली तर श्वासकुठार २ गोळ्या कुटून मधातून घ्याव्यात. दिवसातून तीन चारवेळा हरकत नाही. पण श्वासकुठारचा वापर जितका कमीत कमी करता येईल तितका करावा. कारण यात मनशीळ यासारखी काही द्रव्ये आहेत ज्यांच्या अतीवापराने वाईट "साईड इफेक्ट्स" होऊ शकतात. आजाराचा जोर तीव्र असण्याच्या काळात छातीस महानारायण तेलाने मर्दन करावे. साधे तिळाचे तेल घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकून किंचीत कोमट करावे आणि त्यातेलाने छाती चोळल्यासही चालेल. आणि असे छाती चोळल्यावर ती गरम पाण्याने शेकावी. व्याधीची तीव्रता असताना वापरण्याची आणखी दोन औषधे आहेत. त्यपैकी एक म्हणजे सुवर्णबृहत् वातचिंतामणी. याच्या दोन गोळ्या वेगावस्थेत घ्याव्यात. आणि दुसरे म्हणजे अभ्रक भस्म. हे शेंगदाण्याइतके घेउन मधात मिसळून ठेवावे. आणि दिवसातून चार वेळा द्यावे.

आता त्रासाची तीव्रता थोडीशी कमी झाली कि दमा गोळी, ज्वरांकुश, लक्ष्मीनारायण या गोळ्या प्रत्येकी ३ घ्याव्यात, एकत्र कुटून त्या पाण्याबरोबर सकाळी आणि संध्याकळी घ्याव्यात. शिवाय २०० मि.ली. खोकला काढ्यात ५ ग्रॅ. पिंपळी चूर्ण मिसळून दोन्ही जेवणानंतर ४-४ चमचे तितक्याच पाण्याबरोबर घ्यावे. पोट साफ नाही असे वाटत असेल तर गंधर्व हरितकी १ च्मचा चूर्ण गरम पाण्याबरोबर रात्री जेवणानंतर घ्यावे. किंवा १०-१५ मनुका पान्यात भिजवून थेवून ते पाणी घ्यावे. लहान मुलांना बाहवा मगजाचा काढा द्यावा. ५ ते १० ग्रॅ. बाहवा मगज एक कप पाण्यात टाकून त्याचा अर्धा कप उकळवावा. यात अंगात ताकद राखून कफाचे विलयन करण्याची याची क्षमता आहे.

आता हे होऊ नये म्हणून काही करता येईल का? याला आयुर्वीदात अपुनर्भव चिकित्सा म्हणतात. यात वारंवार कफ होऊ नये, कायम फुफ्फुसे स्वच्छ आनी मोकळी राहवीत, हृदयाला बल मिळावे म्हणून अभ्रक भस्म १ भाग, घौसष्ट पिंपळीचूर्ण २ भाग, मृगशृंग भस्म १ भागा आणि अस्सल वंशलोचन १ भाग एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्यावे. लहान मुलांना हरभर्‍याच्या दाण्याइतके आणि मोठ्याना त्याच्या दुप्पट मधातून किंवा गरम पाण्यातून द्यावे. हेच वासापाक बरोबर घेतल्यास अति उत्तम. वासापाकाबरोबर चौसष्ट पिंपळी चूर्ण घ्यावे.

लहान मुलांना जंत कृमी यामुळे दमा होऊ शकतो. हे कायमचे काढण्यासाठी सतापा काढा २-२ चमचे पाण्याबरोबर द्यावा. मोठ्यांनी ४-४ चमचे दोन्ही जेवणानंतर घ्यावा. शिवाय कृमीनाशक वटी सकाळ आणि संध्याकाळी ३-३ गोळ्या कुटून पाण्यासह घ्याव्यात. आणि कपिलादीवटी ६ गोळ्या रात्री निजताना बारीक करून पाण्यासह घ्याव्यात. लघुमालिनीवसंत हे तापावरचे अगदी सोपे औषध आहे.


आणि समारोप करताना एक सूचना द्यावीशी वाटते ती ही की वारंवार होणारी सर्दी, खोकला, ताप याची परिणीती अनियंत्रीत दमा होण्यात होऊ शकते. यासाठी सर्दी खोकला हा आटॉक्यात राहील याची काळजी घ्यावी. म्हणजे दमा हा त्रासदायक ठरणार नाही आणि त्यावर नियंत्रण मिळवता येईल.



श्रीराम पेंडसे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा