शनिवार, २५ जुलै, २००९

शब्द

माझी मैत्रिण प्राजक्ता पटवर्धन. एक कवियत्री आणि ललित लेखक. खूपच छान लिहिते. तिचा ब्लॉग वाचणे हा एक निखळ आणि निर्मळ आनंद आहे. "शब्द" ही कविता केवळ तिच्या प्रेरणेने आणि सततच्या प्रोत्साहनानेच लिहिणे जमले आहे. त्यामुळे याचे श्रेय तिला आहे. मी निमित्तमात्र आहे.


शब्द
मला कधीच कळले नाही
कवीला शब्द कसे सुचतात
इथे तर गदिमांच्या समोर
शब्द हात जोडून उभे राहतात ॥१॥

पु. ल. म्हणतात,
शब्दावाचून कळले सारे
शब्दांच्या पलिकडले
पण इथे आम्हाला
शब्दांच्यापलिकडले सोडाच
पण काहीही नाहि कळले अलिकडले ॥२॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द शब्द म्हणजे एकापुढे एक अक्षर?
पण मग आपल्या भावना कशा सांगेल निरक्षर? ॥३॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द म्हणजे मनाच्या अथांग जलाशयाचे तरंग
शब्द दाखवतात माणसाच्या व्यक्तिमत्वाचे रंग
जसा उथळ पाण्याला फार खळखळाट
तसे शब्द दाखवतात मनाचा खळबळाट ॥४॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द ही मनाची फुले आहेत
शब्द हे भावनांचे तरंग आहेत
शब्द हे विकारांचे धुमारे आहेत
शब्द हा जीवनाचा आधार आहे ॥५॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द विचारांचा आकृतीबंध आहे
शब्द संस्कारांचा आकार आहे
शब्द वार्‍याची झुळूक आहे
शब्द सोसाट्याचे वादळ आहे ॥६॥


शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द हे प्रभावी हत्यार आहे
शब्द हा भात्यातला बाण आहे
भावना आणि वाणी यांचा आधार आहे
शब्द हे मनाचे द्वार आहे॥७॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द हा प्रणव आहे
शब्द हा ॐकार आहे
शब्द हा मन चित्ताच्या
अस्तित्वाचा साक्षात्कार आहे ॥८॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द हा सप्त सुरांच्या
अस्तित्वाचा आधार आहे
शब्द हा जीवन संगिताचा
भव्य दिव्य गंधार आहे ॥९॥

शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द शब्द हा वाक्यांचा त्राता आहे
शब्द शब्द हा अर्थाचा आधार आहे
शब्द शब्द हा व्याकरणाचा गाभा आहे
शब्द शब्द हा शब्दकोषाचा आत्मा आहे ॥१०॥

पण मग या शब्दांनी काय घडलं?
शब्दशब्दांनी सारे जीवन समजलं?
आयुष्याच्या परमेश्वरी देणगीचं
अवघं अबोध रहस्य उलगडलं? ॥११॥

पहा काय झालं ते :-
शब्दांनी सारी दु:खे सुसह्य झाली
शब्दांनी अवघी सुखे अधिक फुलली
शब्दाशब्दाच्या गाभार्‍यातून
आयुष्याची वाटचाल सोपी झाली ॥१२॥

पण आयुष्याच्या एका टप्प्यात
एक वेळ अशी येते
की शब्द तिथे संपून जातात
आणि मन अंतर्मुख होते ॥१३॥

एकदा शब्द संपले
की मन अज्ञातात जाते
शब्दांच्या पलिकडच्या
अथांग पोकळीत हरवते ॥१४॥

त्या शब्दांच्या पलीकडे
आपण नेहमी एकटेच असतो
नाही तिथे कोणी सखे सोयरे
आपणच आपले मित्र असतो ॥१५॥

तिथे आपले व्यक्तिमत्व हरवते
तिथे आपले अस्तित्वच संपते
तिथे आपले जीवनच संपते
ती न परतीची वाट असते ॥१६॥

म्हणून शब्दावाचून फक्त कळते
संगितातली एक वीराणी
कोण जाणे आहे का ती
कदाचीत आयुष्याची भैरवी ॥१७॥


श्रीराम पेंडसे

२ टिप्पण्या:

  1. majha naav kashala taklat kaka?? tumachch shrey aahe sagala..
    kavitaa maatr sundar. :)

    उत्तर द्याहटवा
  2. त्या शब्दांच्या पलीकडे
    आपण नेहमी एकटेच असतो
    नाही तिथे कोणी सखे सोयरे
    आपणच आपले मित्र असतो............ मस्त !!!!!!

    उत्तर द्याहटवा