सोमवार, २८ डिसेंबर, २००९

स्वप्न

स्वप्न



आज अचानक मनी उसळला

कल्लोळ आठवणींचा

तिच्या जन्मदिनी ध्यास घेतला

स्वप्ने रंगवण्याचा ॥१॥



स्वप्नाच्या या सुरम्य जगती

सयी विहार करती

आठवणींच्या पडद्यावरती पुष्पें

मोहक फुलती ॥२॥



मनात चित्रे उमटत येता

रंग उधळण करती

दीपावलीच्या जणू रातीच्या

नभांगणासम दिसती ॥३॥



स्वप्नी रंगता भान विसरले

तन मन मोहरले

मनोराज्यी ते डुंबत डुंबत

चिंब चिंब झाले ॥४॥



स्वप्ने सारी मनोरम असती

निर्मळ जलसम ती

ज्याच्यासंगे जळ ते मिसळे

तेचि रंग खुलती ॥५॥



स्वप्नांच्या या रंग जलाशयी

मन चित्त विहरती

जणू सागरी मत्स्य कन्यका

सळ सळ सळ पळती ॥६॥



गट्टी जमली नभो मंडळी

शुक्र तारकांशी

शोधित राही चित्त बावरे

मनमिलन राशी ॥७॥



चंद्रकोरीच्या बग्गीमध्ये

विसावले मन माझे

चांदरातीच्या शीतलतेने

मनीचा दाह विझे ॥८॥



इंद्रलोकी मी असेन नृपती

सखी असे राणी

स्वर्गभूमीतील मनराज्यांची

मनरम हीच कहाणी ॥९॥



देवभूमीतील तरू शिखरांवर

फुले तारकांची

वार्‍यासंगे तरू डोलता

होई पखरण त्यांची ॥१०॥



शुभ्र सड्यातून जाता जाता

वाट लुप्त झाली

मार्ग त्यातूनी शोधित असता

वसुंधरा टक्करली ॥११॥



धक्क्याने त्या उंच उडालो

धडपड गडबड झाली

सखी मात्र त्या बग्गीमध्ये

राहूनच गेली ॥१२॥



बग्गीमागे पळता पळता

पाताळी कोसळलो

धरतीने मग मला झेलले

भानावर आलो ॥१३॥



आणि!! अचानक जागा झालो

मधुर खग ध्वनीनी

मन मोहरले शांत जाहले

प्रभात किरणांनी ॥१४॥



डोळे उघडून पहाता पहाता

एक सत्य दिसले

मंच रिकामा दिसला...आणि

स्वप्नची उधळूनी गेले


..........श्रीराम पेंडसे

शनिवार, २६ डिसेंबर, २००९

निर्झरी

निर्झरी

संध्याकाळचे साडे पांच वाजत आले होते. मुंबई सेंट्रलच्या फलाटावर मी अस्वस्थपणे येरझारा घालत होतो. अस्वस्थतेचे कारण? मी दोघींची वाट पाहत होतो. आता कुणाचीतरी वाट बघण्याचे माझे वय कधीच संपले होते हा भाग निराळा. पण तरीही मी, त्या दोघीही येत नव्हत्या म्हणून अस्वस्थ होतो. वाट बघायच्या वयातही मी कोणाची वाट बघीतल्याचे आठवत नाही. आणि आता माझी वाट बघणारी, कधीच "वाट पाहून पाहून दमले" म्हणत आपल्या निर्मात्याकडे निघून गेली. मग मी आता कोणाची वाट पहात होतो? थांबा. असे चमकून पाहू नका. किंवा काय हिरवट म्हातारा दिसतोय राव, अश्या चमत्कारिक नजरेनेही नका बघू! मी वाट पहात होतो त्यातली एक म्हणजे, जयपूर एक्सप्रेस!!! गाडी फलाटाला लागायची वाट बघत होतो. पांच पन्नासला गाडी सुटणार होती, आणि अजून गाडीचा पत्ता नव्हता. गाडी येणार कधी? आपण डबा शोधणार कसा? उगाचच माझे बी.पी. वाढायला लागले होते. अखेरीस गाडी आली. डबा शोधला. बसलो. आता दुसरीची वाट बघत होतो. कोण ही दुसरी? एक पंचविशीतली तरूणी!! अल्लड? अवखळ? आवाजावरून तरी तसे वाटायचे. पण प्रत्यक्ष काय ते माहीत तव्हते. लवकरच कळणार होते. माझी उत्सुकता ताणली गेली होती. ही तरूणी म्हणजे माझी मानलेली नात अद्विका. अद्विका चेतन. ही मला आज भेटायला येणार होती. वेळ दहा, फारतर पंधरा मिनीटेच उरलेला! आता ही बाई कधी येणार? बोलणार कधी? का नुसता माझा चेहेरा पहायला येणार होती कोण जाणे! बरे मी काही गाजलेले व्यक्तीमत्व नव्हतो, की आयुष्यात कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या व्यक्तीने, विशेषतः मुलीने मला भेटायला धडपडत यावे! मला काही कळत नव्हते. फक्त इतकेच कळत होते की ज्या अर्थी ही महान मुलगी इतकी तडतड करत भेटायला येतीये म्हणजे जगाच्या दृष्टीने नसलो तरी कोणाच्यातरी दृष्टीने विशेषतः तिच्या दृष्टीने आपण काहीतरी आहोत. कदाचित विशेष आहोत. पण तरीही माझे वाढलेले बी.पी. काही कमी होत नव्हते. अद्विका उर्फ योगिता उर्फ योगी ही माझी मुंबईतली मुलुंडला राहणारी नात. नातं पूर्णतया मानलेलं. पण ते नातं रक्ताचं असावं अश्या ओढीने ही मुलगी मला, भांडुपहून संध्याकाळची मुंबईची तुफान गर्दी कापत कापत भेटायला येत होती. रक्ताच्या नात्यातही ही ओढ आजच्या दिवसात अभावानेच पहायला मिळते. ही मुलगी इतकी धडपड करून येत आहे - केवळ काही दिवसांच्याओळखीवर - याचंच खरंतर मला कौतुक होते. अप्रूप होतं. कोणत्या अनामिक आपुलकीपोटी ही पोर भेटायला आली? कोणता ऋणानुबंध आहे हा? की गेल्या जन्मीचा हा बंध आहे? मी बराच विचार करतो. किती जण विशेषतः मुली केवळ काही दिवसांच्या ओळखीवर भेटायला येतील? इतके कशाला? मी स्वतःला हाच प्रश्न विचारून पाहीला की मी स्वत: तिच्याजागी असतो तर असा गेलो असतो का? हा प्रश्न मी मला, माझ्या मनाला त्यानंतर कित्येकवेळा विचारला, अजूनही विचारतो आणि त्याचं उत्तर प्रामाणिकपणे सांगायचे, तर "नाही, नसतो गेलो" असेच येत राहिले. या अनामिक मायेच्या ओलाव्याचे रहस्य उलगडलेले नाहीये. तेंव्हाही उलगडले नव्हते आणि आजही उलगडलेले नाही. याची उत्तरे अजूनही मला सापडलेली नाहीयेत. एक तर मला असे कोणी भेटायला येऊ शकेल आणि ते ही एक मुलगी आणि ती पण काही दिवसांच्या ओळखीवर? हे माझ्या स्वप्नातही नव्हते. माझ्या तर्कसंगत बुद्धीला ते झेपत नव्हते. इतक्या लांबून. कामावरून लवकर निघून, आपल्याला कोणीतरी भेटायला येऊ शकतं यावर एकतर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या सततच्या नकारात्मक वृत्तीच्या मनाला ते पटत नव्हतं. पण तरीही ते सत्य होतं. ती जेंव्हा मला म्हणाली होती की, "आजोबा, मी तुम्हाला भेटायला येणार आहे." तेंव्हा मी ते फारसे मनावर घेतले नव्हते. पण खरंच तिचा आदल्या दिवशी फोन आला तेंव्हा मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. आयुष्यात मला असं कोणी भेटायला येण्याच्या वेळा फार थोड्या आल्या. मी कोणालातरी भेटायला जाण्याचे योगच अधिक आले. मला भेटायला लोक कधी आले? आई, वडिल आणि आता सौ. गेल्यावर. त्यामुळे " मी स्टेशनवर भेटायला येते" असे तिने म्हटल्यावर माझ्या मनात अपार उत्सुकता, आनंद दाटून आला होता. इतके दिवस तिच्याशी फोनवर बोलणारा मी, आता काय बोलू असा प्रश्नही मनात कुठेतरी अस्वस्थ करत होता. फोनवर बोलणे निराळे हो! तिथे आपला चेहेरा दिसत नसतो. पण प्रत्यक्षात भेट झाल्यावर बोलणे निराळे. तिथे नेहमीच बोबडी वळते. नेहमी लंब्या चौड्या गप्पा मारणारा मी. पण प्रत्यक्ष भेट आणि तीही तुलनेने एका अनोळखी तरूण मुलीशी? काय बोलू मी? वयात असलेला खूप मोठा फरक आणि तरूण पिढीचे विषय! कसे जमणार? नाही म्हटले तरी थोडेसे टेन्शन आले होते. अखेर ती आली. गाडी सुटायला १० मिनिटे असताना ती आली. ती आली! तिने पाहिले!! तिने जिंकले!!!..... थांबा. परत असे या सुप्रसिद्ध उद्गारांनी दचकू नका. ती माझी नात आहे हे लक्षात ठेवा. अहो मी वर म्हणालो ना? मला सॉलिड टेन्शन आले होते हो! त्यामुळे मी ती आल्यावरची प्रतिक्रिया दिली आहे बरे का!! अहो मुलींना भेटून सैर भैर होण्याचे माझे वय केंव्हाच सरले आहे!!! पण अद्विका आली तीच मुळी वार्‍याच्या, एखाद्या मंद, सुखावणार्‍या झुळुकीसारखी. भर उन्हाळ्यात घामाच्या धारा लागल्या असताना वाहू लागलेल्या थंड गार झुळूकीसारखी! सगळे टेन्शन पूर्णपणे कादून टाकणारी झुळूक होती ती. एखाद्या मुलीशी बोलताना येणारा अवघडपणा घालवून टाकणारी झुळूक. ही मुलगी जरी मुंबईची अशक्य गर्दी तुडवत आली असली तरी चेहेरा प्रसन्न आणि हसरा होता. इतक्या गर्दीतून धडपडत आल्याचा लवलेशही चेहेर्‍यावर नव्हता. आपण आपल्या सख्ख्या आजोबांशीच बोलत आहोत अशी वागण्यातली सहजता! तरीही तिच्या चेहेर्‍यावर आजोबांना बघण्याची उत्सुकता लपत नव्हती. सर्वच आजोबा-नातींचं सूत नेहमीच जमते असे नाही. पण काही नातींचे आजोबा लोक हे खूप आवडते असतात. लाडके असतात आणि जणू अश्याच आपल्या आवडत्या सख्ख्या आजोबांना भेटल्यावर होणारा आनंद अद्विकाच्या चेहेर्‍यावरून स्पष्ट ओसांडून वाहत होता. दहा मिनीटे इकडच्या तिकडच्या, हवापाण्याच्या गप्पा झाल्या. खरतर दहा मिनिटे हा काही गप्पा मारण्यासाठी पुरेसा वेळच नव्हे. दहा मिनिटात होते ती फक्त ओळख. कारण तितक्या वेळात आणखी काय बोलणार ना? पण तरीही, ती आवर्जून आल्याचे मला प्रचंड कौतुक होते. काय बोललो याला महत्त्व नव्हतेच. काही वेळा कितीही भडाभडा बोलले तरीही ते अपुरे पडते, आणि काही वेळा अतिशय कमी शब्दात किंवा काहीही न बोलता बरेच काही समजते. काही लोकांची ही खासियत असते की ही मंडळी डोळ्यांनी बोलतात. अगदी पटकन सांगता येईल असे उदाहरण म्हणजे माझ्या पिढीतला महान कलावंत - राज कपूर. तो मनुष्य डोळ्यांनी बोलायचा. या मुलीला बोलायची जबर आवड आहे, त्याचप्रमाणे हिची ही पण एक खासियत आहे की हिचा चेहेरा बोलका आहे आणि तितकेच तिचे डोळेही प्रचंड बोलके आहेत. तिची बडबड चालू असली तरीही ती डोळ्यानी खूप बोलते. वेगळं बोलते. म्हणून म्हणालो की काय बोललो याला महत्त्व नव्हतेच. ती आवर्जून आली याचाच मला जबर आनंद झाला होता. गाडी सुटण्याची घंटा झाली. डब्यातून तिच्या बरोबर खाली उतरलो. आणि निघताना तिने मला भर प्लॅटफॉर्मवर अगदी वाकून नमस्कार केला. मी इकडे तिकडे चमकून बघितलं की कोणी पाहत नाहिये ना? कारण "हाय, फाईन, थँक यू" या युगात हरवत चाललेल्या सुसंस्काराचे दर्शन होते. लोकांना न पटणारे!! चेष्टेला आमंत्रण देणारी कृती होती ती. पण खरंतर तिच्यावरच्या संस्कारांचे हे दर्शन, सुखद होते. तर ही अशी, अद्विका या अतिशय लोभसवाण्या, सालस, सरळ स्वभावाच्या पण तरीही अत्यंत मनस्वी मुलीशी माझी झालेली ही पहिली प्रत्यक्ष आमने सामने भेट. तसे ही प्रत्यक्ष भेट होण्याआधी मी तिच्याशी भरपूर गपा मारल्या होत्या आणि अजूनही गप्पा मारतो. अगदी मनापासून गप्पा मारतो. बोलघेवडेपणा हा तिचा आवडता छंद. निदान मला तरी असे वाटले. आणि मला हिच्याशी आता मी काय बोलू असा प्रश्न कधीच पडला नाही. त्यातून हे अजब रसायन उलगडत गेलं. पण याची सुरूवात कशी झाली?......

...... या भन्नाट मैत्रीची सुरूवात अशी झाली. तर ऒर्कुटवर मी मागे, कुणाचे नविन स्क्रॅप आले आहेत का हे बघत होतो. महिना एप्रील असावा. सौ. जाउन सात आठ महिनेच झाले होते. मन अतिशय अस्वस्थ असायचे. मग अशावेळी मी ऑर्कुटवर वेळ घालवत असे. कोणी बोलायला असले की मग मला विसरायला होत असे. त्यावेळी मला "अद्विका चेतन" नावाच्या व्यक्तिने माझी प्रोफ़ाईल वाचलेली दिसली. नांव थोडेसे वेगळे होते. Uncommon होते. म्हणून कुतुहलाने तिची प्रोफाईल वाचली. आणि मैत्रीची विनंती केली. मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे वयातल्या खूप मोठ्या फरकामुळे विनंती मान्य होईल की नाही ते ठाउक नव्हते. पण तिने ती विनंती मान्य केली. आणि तिने जो पहीला मला स्क्रॅप पाठवला, त्यातून तिच्या मोठ्यांचा आदर ठेवण्याच्या संस्कारीत मनाचे पहीले दर्शन घडले. तिने लिहीले होते. " सर्वप्रथम तुम्हाला माझा आदरपूर्वक नमस्कार." मी तिला विनंती केली होती की मल काका नको म्हणू. त्यावर तिचे उत्तर, " ठीक आहे. मग मी तुम्हाला आजोबा म्हणते. कारण मी कोणाला आजोबा अशी हाक मारायला कोणीच नाहीये." आणि मग इथून या आजोबा नातीच्या, सख्ख्या नसलेल्या पण सख्ख्या वाटाव्या अश्या नात्याची वीण घट्ट होत गेली, त्यातून एक मनोरम, आनंददायी चित्र तयार व्हायला लागले. स्क्रॅपच्या माध्यमातून आणि नंतर मेलच्या मधून बोलत होतो. ऑन लाईन ही बोलत होतो. मग मी तिला फोनवर बोलशील का? अशी विनंती केली. ती विनंतीही तिने मान्य केली. आम्ही फोनवर बोलू लागलो. बोलता बोलता कळले की "चेतन" हे तिचे "अहो' आहेत. आणि मग तिच्याशी गप्पा मारताना अद्विका हे व्यक्तीमत्व हळू हळू साकार व्हायला लागले. आणि ही मुलगी अफाट आहे याचे प्रत्यंतर मला लगेच ती प्रत्यक्ष भेटायला येणार आहे असे म्हणाली तेंव्हा आले. ते कसे याचा किस्सा वर आला आहेच.

अद्विका तरूण पिढीची प्रतिनिधी आहे. तरीही ही मुलगी आधुनिकता आणि पारंपारीक संस्कार यांचे अनोखे पण आल्हाददायी मिश्रण आहे. ती एकत्र कुटुंबात राहते. अगदी मिळून मिसळून. हे ही हल्ली त्या मानाने कमी दिसणारे दृष्य आहे. घरी सासरे, सासू आणि दोन नणंदा आहेत. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचे वागणे नाही पटले तरी पण ही मुलगी सर्वांशी अगदी मिळून मिसळून आहे. छोट्या छोट्या कुरबुरी प्रयेक घरात असतातच. माझ्या मते जगात असे Ideal सुखी कुटुंब नाही, की ज्या घरात सून आणि मुलगी असताना सून कोण आणि मुलगी कोण असा प्रश्न पडावा! जे कोणी असे म्हणत असतील की "आम्ही खूप सुखी आहोत." त्यापैकी जवळ जवळ सर्व जण खोटेच बोलत असतात असे मी मानतो. प्रत्येक कुटुंबात मतभेद हे असतात. छोट्या मोठ्या कुरबुरी असतातच. पण त्या कुरबुरी, छोटे मोठे वाद झेलायला, त्या कुरबुरींच्या काट्यांचे सुखद फुलात रूपांतर करायला धैर्य लागते, तशी मानसिकता लागते, क्षमता लागते, आणि जबर इच्छाशक्ती लागते. आणि हे सर्व तिच्याकडे आहे असे मला तिच्याशी बोलताना, तिला प्रत्यक्ष भेटल्यावर वाटले. मी अद्विकाच्या या सुखी कुटुंबाला प्रत्यक्ष भेटून आलोय. मी त्यांचा मनमिळावू पाहुणचार अनुभवून आलोय. त्यांच्या घरातले आनंदी वातावरण पाहून आलोय. ती घरातली सून वाटण्यापेक्षा मुलगीच वाटते. या कुटुंबाला भेटल्यावरच मी हे बोलतोय. या मनस्वी मुलीची दोन लक्षात येणारी वैशिष्ट्ये आहेत. तिची ती बलस्थाने आहेत. बलस्थाने म्हणजे मला असे म्हणायचे आहे की या दोन गोष्टी म्हणजे तिची Identity आहे. ओळख आहे, एक म्हणजे रानावनातून खडकातून खळखळत वाहणार्‍या निर्झरासारखे खळखळून हसणे, आणि दुसरे म्हणजे गप्पांचे प्रचंड वेड. बरे गप्पा म्हणजे फालतू बडबड नव्हे बरे का! एखाद्या व्यक्तीला बांधून ठेवण्याची, आपलेसे करून घेण्याची क्षमता तिच्या गप्पात आहे. एखादा एरंडेल प्यायल्यासारखा चेहेरा बदलण्याची खात्री तिच्या या हास्य-धबधब्यात आहे. तुमच्या मनावरचे मळभ काढून टाकण्याची ताकद तिच्या व्यक्तिमत्वात, तिच्या नुसत्या उपस्थितीत आहे. याचं प्रत्यंतर मला नेहमीच तिच्याशी गप्पा मारताना येतं. तिच्या उपस्थितीत दु:खाला नेहमीच No Entry असते. मग ती अशी अचानक भेट असो, किंवा फोनवरची गप्पांची मैफल असो. तिचे आणखी एक वेड म्हणजे हिंदी सिनेमे. या मुलीला सिनेमाचे प्रचंड वेड आहे. आधुनिक हिंदी सिनेमांचा हा जणू चालता बोलता ज्ञानकोषच आहे. मला स्वतःला हिंदी सिनेमांचे बिलकूल वेड नाही. मी फारसे सिनेमे बघतही नाही. पण तिच्याकडचा सिनेमाच्या बाबतीतला माहितीचा साठा पाहून मी चकित झालो. ही मुलगी मनस्वी आहे असे मी म्हणालो होतो. मनस्वी म्हणजे मला नक्की काय म्हणायचे आहे? सर्व मनस्वी माणसे थोडी हट्टी असतात. पण सर्व हट्टी माणसे मनस्वी नसतात. मनस्वी म्हणजे ही मुलगी स्वतःच्या मतांबद्दल आग्रही आहे. तिची मते ठाम असतात. कोणत्याही गोष्टीत. जे स्वतःला पटत नाही ते ती नाही स्विकारणार. एखादी गोष्ट तिला नसेल पटत तर ती तोंडावर सांगेल. पण तेही समोरच्या व्यक्तीचा योग्य तो आदर ठेवूनच. पण तरीही समोरच्या व्यक्तीने पटवून देईपर्यंत ती आपल्याच मतावर ठाम राहील. माझ्या मते याला हट्टीपणा नाही म्हणत. माझ्या मते हट्टीपणा म्हणजे समोरच्याचे मत ऐकून न घेणे, त्याला त्याचे मत सिद्ध करण्याची संधी न देणे. ती तसे नाही करणार. ती म्हणेल की तुमचे म्हणणे पट्वून द्या. पण पटले नाही मात्र साफ साफ सांगून टाकेल. मग तिथे कोण आहे हे ती नाही पाहणार. पण तरीही ती समोरच्याचा योग्य तो मानच ठेवेल. याला मी मनस्वी व्यक्तीमत्व म्हणतो. आपल्या आयुष्यात दु:खे नेहमीच येतात. दु:खे कोणाला चुकलेली नाहीत. आणि त्या दु:खाची तीव्रता, झळ त्या आपल्यालाच कळते. कारण आपल्याला ते भोगावे लागते. आपण त्यातून गेलेलो असतो. आपल्या दु:खात आपण दुसर्‍याकडे मदतीची हाक देतो तेंव्हा आपण हे विसरतो की तो पण अश्याच प्रसंगातून गेला असू शकेल. पण या ग्रेट मुलीचे वैशिष्ट्य असे की ही एखाद्याच्या मदतीला आपलाच प्रॉब्लेम आहे असे समजून जाईल. आणि यथाशक्ति मदत करेल. आपल्या काही कटकटी आपल्यालाच सोडवाव्या लागतात. पण अशावेळी एखादी व्यक्ती नुसती मदतीला धावून आली तरी ते पुरेसे होते. मला हे एकदा तिच्याबाबतीत जाणवले. असाच मी कधीतरी प्रचंड अस्वस्थ होतो. कारण नेहमीप्रमाणे सौ. च्या आठवणी!! मी तिला हे त्यादिवशी सांगितले की "मी आज खूप अस्वस्थ आहे." ती पटकन विचारही न करता म्हणाली, "मी येऊ का?" नाहीतर काय होते? "हं ठीक आहे. मी पहातो कसे जमतय ते!!!" किंवा " बघू. आज जमणार नाही. चार दिवसांनी चालेल का?" तो पर्यंत आपली गरज संपलेली असते. अद्विकाला असे पटकन येणे शक्य नाहीये हे मलाही माहीत होते. पण नुसते ती म्हणाली हेच मला तेंव्हातरी पुरेसे होते. अर्थात यात तिची, एकदा एखाद्याला आपले मानल्यानंतर त्याच्या दु:खात सहभागी होण्याची वृत्तीच दर्शवते नाही का?

.........त्यानंतर अद्विकाने मला दुसरा धका दिला तो पुढच्याच महीन्यात म्हणजे जुलै २००९ मधे, माझ्या वाढदिवसाच्यादिवशी. वाढदिवस हा काही साजरा करण्याचा विषय, निदान माझ्या दृष्टीने तरी, राहिलेला नाहीये. लक्षात ठेवून वाढदिवस साजरे होतात ते फक्त नेते मंडळींचे. आपल्यासारख्या सामान्यांचे नाहीत! आणि त्यातून परमेश्वराने माझ्या वाढदिवसाच्या दोनच दिवस आधी सौ. ला आपलेसे करून घेऊन वाढदिवस हा विषय या पुढे कायमचा संपवून टाकला आहे. वाढदिवसाचे कौतुक ज्या वयात असतं आणि वाढदिवस साजरे करण्याचं जेंव्हा माझं वय होतं, त्या वयात, वाढदिवसाच्या दिवशी पालकांना नमस्कार केल्यावर " आज का बरं? काय आहे आज?" अशी रूक्ष स्वरात विचारणा व्हायची. पूर्वी कसे ढिगभर मुले असायची. कुणाकुणाचे वाढदिवस लक्षात ठेवणार ना? पण आमच्या बाबतीत तसे नव्हते. आम्ही एकटेच होतो!! मग आम्हीच अवघडत सांगत असू की "आज माझा वाढदिवस आहे." " अस्सं? आज तुझा वाढदिवस आहे का? बरं ठीक आहे." पालक फारच खूष असले तर, "अरे वा . छान!!!" पण त्यानंतर फुलस्टॉप. अश्याच संवादांची सवय लागलेली. इतरांचे वाढदिवस आमच्या पालकांच्या लक्षात राहतात. आठवणीने पेढे, हार किंवा गुलाबाची फुले आणली जायची. आपल्याच वाढदिवसाचा काय प्रॉब्लेम आहे? हे कधीच न सुटलेले कोडे होते. आणि हेच त्यावेळी मनावर कोरले गेलेले होते की वाढदिवस हा आपल्यासाठी नाही. बरं फक्त माझ्याच बाबतीत हे होत होतं असं नाही. माझ्या बहिणींच्या बाबतीतही हाच प्रकार होत असे. आम्हाला हार तुरे नको होते. पेढेही नको होते. चार मायेच्या, प्रेमाच्या शब्दांनी काम भागले असते. पण नाही. ते कधिच झाले नाही. त्यामुळे हे आपल्यासाठी नाही हेच मनावर बिंबलेले. अर्थात मोठेपणी हे चित्र बदलले. पण तरीही आपले वाढदिवस हे महत्त्वाचे नाहीतच हेच मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी, दगडी पायर्‍यांवरून घसरू नये म्हणून टाकीचे घाव घालून खड्डॅ पाडलेले असतात ना तश्या पर्मनंट खड्ड्यांसारखे, घट्ट रूतुन बसलेले होते. आमच्या लहानपणी आम्ही महत्त्वाचे नव्हतो. आमच्या मोठेपणी आता आपले कौतुक बास असे मनावर ठसले होते. मला इथे व. पु. काळे यांचे एक वाक्य आठवले. जे माझ्या पक्के लक्षात राहिले आहे. " लहानपणी आम्ही आमच्या आई वडिलांच्या गाद्या काढत होतो. आता आम्ही आमच्या मुलांच्या गाद्या काढतो." आणि अश्या मानसिक नकारात्मक पार्श्वभूमीवर ही मुलगी केवळ मला भेटायला आणि शुभेच्छा द्यायला मुंबईहून आली? हा जिव्हाळा माझ्या बुद्धीबाहेरचा होता. धक्का मला आवाक करणारा होता,आनंददायी होता, सुखाचा होता, तरीही मला न पेलणारा होता. मला त्या दिवशी झालेला आनंद, मला तरी शब्दात न मांडता येणारा आहे. वर्णन करण्यापलिकडचा आहे. मला वाटते की बहुतेक माझा तो आयुष्यातला सर्वात आनंदी वाढदिवसाचा दिवस असावा. सौ.च्या अकाली मृत्यूचे कायमचे मळभ वाढदिवसावर असूनही तो दिवस मला आनंदाचा गेला. समाधानाचा गेला. त्या दिवशी अद्विका, तिचे "अहो" आणि तिचे तिला वडिलांप्रमाणे असलेले त्यांचे कौटुंबिक मित्र असे तिघे जण आले होते. मला तर त्या दिवशीही धड बोलायला सुचत नव्हते. मला माझ्या भावना आवरणं अवघड जात होतं. खूप धडपड करावी लागत होती. मला कसंबसं जमलं ते. हे सर्व तिला कळलं होतं. मी ते चेहेर्‍यावर न दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण तरीही त्या चतुर मुलीच्या हे लक्षात आलं होतं. त्यादिवशी तिने आजोबांच्या या मनस्थितीवर अतिशय सहजतेने पांघरूण घातलं. आजोबांची विचीत्र मनोअवस्था आपल्याला समजली आहे हे तिने तेंव्हा जाणवू दिलं नव्हतं. आपण आपल्या सख्ख्या आजोबांबरोबर आहोत, या कुटुंबातलेच एक आहोत अश्या सहजतेने ती वावरली होती. पण नंतर कधीतरी विषय निघाला असताना तिने, माझी मनस्थिती माझ्या डोळ्यात दिसली होती हे बोलून दाखवलं होतं. पण त्यादिवशी तिच्या चेहेर्‍यावर समाधान होते. आजोबांना भेटून शुभेच्छा दिल्याचा आनंद चेहेर्‍यावरून ओसांडून जात होता. आणि म्हणून हा दिवस मला आयुष्यभर लक्षात राहील. हा दिवस असा संस्मरणिय झाला, अतिशय आनंदी गेला! कसं सांगू? शब्द सुचत नाहीयेत. याचे संपूर्ण श्रेय निर्विवादपणे अद्विका ऊर्फ योगिता उर्फ योगी या माझ्या महान नातीलाच द्यावे लागेल. आणि हे श्रेय मी जर तिला नाही दिले, तर हा तिच्यावर नुसताच अन्याय नाही, तर तिचा स्वतःचा, तिच्या सुंदर, निरागस भावनांचा, तिच्या माझ्यावरच्या निर्मळ मायेचा हा अपमानच ठरेल......

.....त्यानंतर मी या माझ्या लाडक्या नातीला दोन तीन वेळा भेटलेलो आहे. त्यात मला आणखी एक गोष्ट कळली म्हणजे ही मुलगी रागावते पण. तिला रागही येतो. तसा सगळ्यानाच येतो हो!!! पण तिला राग येतो हे मला कळण्याचे काहीच कारण नव्हते. कारण अद्विका माझ्यावर कधीच रागवली नाहीये अणि ती दुसर्‍यावरही चिडलेले मी पाहीले नाहीये. त्यामुळे हा तिच्या स्वभावाचा पैलू तिने मला सांगितल्यावर कळला. गपा मारतान मी तिला विचारले होते की,

"तू कधी रागवली आहेस का?"

" हो, आजोबा. चिक्कारवेळा. मला राग आवरला नाही की मी लहानपणी वस्तू फेकायची. अगदी लहान असताना मी जेवणाचे ताट पण फेकले आहे. पण आता मी रागावली ना की सांगते कि गप्प बसा सगळे जण. मला शांत बसू द्या जरा. असे मी म्हणते आणि डोळे मिटून बसून राहते."

ही गेल्या महीन्यातली भेट नेहमीचे जिवलग भेटावे अशी सहज होती. त्यात सहजता होती. त्यावेळी तिची अजून एक मैत्रीण भेटली. सुनीता तिचे नाव. या मुलीने मला आधीच मित्र केले होते. भेटण्याचा योग हा नंतर आला. अद्विकाप्रमणे ही पण मला आजोबा म्हणते. अद्विकाप्रमाणे हिच्याशीपण मी भरपूर गप्पा मारल्या आहेत. अतिशय सुस्वभावी आणि मन मिळावू मुलगी आहे ही. अद्विकाची मैत्रिण शोभावी अशी. त्या दोघी अगदी घट्ट मैत्रिणी आहेत. मागे एक हिंदी सिनेमा आला होता. "सीता और गीता". या दोघींच्या प्रवृत्तीही त्या सिनेमातल्या व्यक्तीमत्वासारख्या होत्या असे मला उगाचच वाटून गेले. या दोघींना गेल्या महिन्यात भेटण्याचा योग आला. त्यात पहिल्या भेटीचे टेन्शन नव्हते. मला मुंबई सेंट्रल स्टेशनवर आलेल्या अवघडलेपणाचा आता लवलेशही नव्हता. बोबडी वळण्याचा प्रश्न नव्हता. अद्विकाच्या वागण्यातली ती सहजता, मोकळेपणा, पहिल्या दिवशीची आपुलकी जशीच्या तशी टिकून होती. ती आजोबांबद्दल वाटणारी माया, ते प्रेम, जिव्हाळा कायम होता. गप्पांना विषयाची कमतरता नव्हती. मी त्यांच्या घरी भोजनाचा पाहूणचारही घेऊन आलोय. तिच्या "अहों"शी पण गप्पा मारून आलोय. हे दोघेही "मेड फॉर इच अदर" आहेत. तिचे "अहो" हे पण तिच्या इतके बोलघेवडे नसले तरी पण बोलके आहेत, अतिशय सुस्वभावी आहेत. त्यांच्याशी गप्पा मारणे हा ही एक निखळ आनंद आहे. मनमिळावू आहेत. फक्त फरक इतकाच आहे की तिच्या मानाने ते अबोल आहेत. म्हणजे त्यांना बोलायला नकोय का? तर मला तसे नाही वाटत! बोलायला हवंय. गप्पाही ते मारतील. पण या लेखाच्या नायिकेसारखा हास्य आणि गप्पांचा धबधबा नसेल तो. अगदी मितभाषी! अर्थात तिच्या उपस्थितीत फार थोड्याना गप्पांचा चान्स मिळतो. पण माझ्यासारख्यांना तसे चालतेही. कारण ती बोलत असताना मलाच काय पण कोणालाही कधीच कंटाळा येत नाही. कुणाच्या घरी अगदी पहिल्यांदा गेल्यावर मला नेहमीच अवघडल्या सारखे होते. पण त्यादिवशी मात्र असे बिलकूल झाले नाही हेच तिच्या सुस्वभावी, मनमिळावू, व्यक्तीमत्वाचे खूप मोठे यश आहे असे मला वाटते. आणि या अश्या निरागस आणि प्रसन्न व्यक्तीमत्वाने, अतिशय सुस्वभावी मुलीने मला आजोबा मानले, एखादी सख्खी नात काय करेल अशी मनापासून माझ्यावर माया केली, निखळ, निर्मळ आणि निर्व्याज प्रेम केले, हे मी माझे भाग्यच समजतो. माझ्या आयुष्यातले हे आनंदाचे क्षण मी माझ्या मनाच्या खोल कप्प्यात, जसे लहान मूल त्याला दिलेली कॅडबरी झोपतानासुद्धा आपल्या मुठीत घेऊन झोपते, तसे अगदी जिवापाड जपून ठेवीन. अत्तर उडाले तरी जसा अत्तराचा वास कमी होत नाही, तसा या क्षणांचा सोनचाफ्याच्या सुगंधासारखा मन सुखावणारा, मनाला दिलासा देणारा परीणाम कधीही कमी होणार नाही. तरी या अश्या माझ्या अफाट नातीला उदंड सुखी आयुष्य लाभो, तिच्या आनंदाचा, हास्याचा धबधबा कधीच न आटो, तिच्या आयुष्याचे आनंदवन होवो, आणि तिच्या या निरागस आणि आनंदी व्यक्तीमत्वाने तिच्या सहवासात आलेल्यांच्या मनात आणि तिच्या आनंदमयी कुटुंबात सतत सुख व समाधानाची कारंजी फुलत राहोत, तिच्या आयुष्याची सतार कायम जुळलेल्या सुरात झंकारत राहो, अशी मी या जगाचे नियंत्रण करणार्‍या शक्तीकडे मना पासून प्रार्थना करतो. पु. ल. म्हणतात तसे, "केवळ वयाची वडिलकी यापलिकडे हातात काहीही नाहीये. तेंव्हा फक्त आशीर्वाद द्यायचा की मोठी हो, यशस्वी हो, मुली औक्षवंत हो "



............श्रीराम पेंडसे

सोमवार, २१ डिसेंबर, २००९

सप्तपदी

सप्तपदी

सप्तपदी म्हणजे तरी काय आहे?

बरोबरीने आधार देण्याचे वचन आहे

एकामेकांचे सख्य सुखवर्धिनी आणि,

दॄढ होण्याचे दिवा स्वप्न आहे ॥१॥



एकामेकांचे मनोधैर्य वाढवण्याच्या

भीष्मनिश्च्यायाचा भगिरथ ठराव आहे

सातजन्म सुखी जीवनाचा

अबाधीत सुमंगल करार आहे ॥२॥



आयुष्याचा हा भगीरथ ठराव

परमेश्वरसभेत नामंजूर झाला

साताजन्माचा मनोरम आधार

जग नियंत्याने काढून घेतला ॥३॥



दिनकर हळू हळू निमत असताना

सोबतीची वाट बघत होतो

हातात हात घालून मी

सप्तपदीची वाट चालणार होतो ॥४॥



अशीच वाट बघता बघता

सांडलेला काळोख कळलाच नाही

नंतर भयाण रातीत कळले

की कुडीत प्राणच उरला नाही ॥५॥



स्वप्नं अत्तरासारखी उडून गेली

जाणिवा राठ आणि निबर झाल्या

फ़्रीझमधल्या कणकेसारख्या

थंड आणि बधीर होऊन गेल्या ॥६॥



आयुष्य हे खडकाळच असते

सारखी ठेच लागतच असते

असेच धडपडत धक्के खात

जगायचे स्वप्न बघायचे असते ॥७॥



या स्वप्नांची सोनेरी किनार

थोडाच वेळ अस्तित्वात असते

काळी किनार मात्र नेहमी

सर्व स्वप्नांना गढूळ करते ॥८॥



सप्तपदीचा अलिखीत ठराव

प्राक्तनामुळे फ़ेटाळला गेला

अल्लादिनच्या दिवास्वप्नाचा

चकणा चूर करून गेला ॥९॥



सांज वय हे खरोखरी

स्वप्नांचे वय असते का?

आणि सारी ही दिवास्वने

जागेपणीच दिसतात का? ॥१०॥





.....श्रीराम पेंडसे

प्रारब्ध

प्रारब्ध

पडद्यावरची डोंगरी रेष

बघता बघता सरळ झाली

एक हसरा प्रसन्न जीव

बरोबर घेऊन निघून गेली



"सॉरी, सारे संपले आहे"

शब्द पहा किती स्वस्त होते

सांत्वनी अर्थहीन शब्द ते

नसते वापरले तरी चालले असते



"आम्ही काही करू शकलो नसतो"

म्हणत सफेद कोट कोरा झाला

तितक्याच निर्विकारपणे तो

दुसरा पडदा पाहू लागला



ही पांढरी कोटधारक मंडळी

संत पदाला योग्य असतात

सहजतेने सत्य स्विकारत

दुसर्‍या मृत्यूला सामोरे जातात



असा हा संत महात्मा

आपल्या वाट्यालाच का येतो

कुठल्या पापाची फळे म्हणून

देव अशी कठोर शिक्षा देतो



तेंव्हा मात्र खात्री पटली

आपण किती हताश आहोत

मी मोठा, मी विशेष तज्ञ

नियंत्यापुढे सर्व खुजे आहोत



आम्ही इतके मूढ कसे की

आम्हाला खुणाही नाही कळल्या

अश्रूंच्या महा पाणलोटात

सार्‍या जाणिवा वाहून गेल्या



मनुष्य प्राणी, निर्मात्यापुढे

पहा किती हतबल असतो

"बरे झाले, सुटली बिचारी"

असे समाधान मानून घेतो



का बरे सुटली ती?

वेळ तिची आली होती?

की नियतीपुढची आगतीकता

त्या उद्गारात दिसत होती?



काय होते तिच्या प्रारब्धात

की बोलकी उर्जा बंद पडावी?

हां हां म्हणता बघता बघता

जीवनज्योत अकस्मात निमावी?



किती दु:खे किती घाव

झेलले होते तिने एकटीने

चटका लागू दिला नव्हता

तिने आपल्या शिकस्तपरीने



श्रीराम पेंडसे
पाऊस

उजळ काजळ मेघ दाटले जलधींचे संमेलन भरले

बघता बघता नभ झाकोळले सवितेला ते झाकून गेले १

अवघ्या समस्त रवीकिरणांशी जलधींचे जणू युद्ध जुंपले

जलबिंदूंनी मेघ लगडले गर्जत गर्जत बरसू लागले २

मेघ घेऊनी आला वारा त्या थेंबांच्या होती धारा

गारा वारा आणि पर्जन्यधारा करिती वसुंधरेवर मारा ३

पाऊस आला झरझर आला जमिन झाडे भिजवून गेला

धुंद मृदगंघ पसरला सारा परिसर कुंद झाला ४

सोसाट्याचा वारा आला मेघ घेऊनी धूम पळाला

पळता पळता त्याने केला रवीकिरणांचा मार्ग मोकळा ५

नभचर किरणे घेऊनी आला तरूशिखरावर उधळीत आला

त्यांनी सारा आसमंत पांघरला अवघ्या सृष्टीचा स्वर्ग जाहला ६

सायंकिरणे वने पखरती पल्लवी सुवर्णकणही बहरती

मधूनच जलसर झरझर येती क्षणभर त्या जरतारी दिसती ७

हलक्या सुवर्णधारा झरती अवघा परीसर प्रसन्न करती

लता पल्लवे बेभान होती अवघी सृष्टी बहरून येती ८

चिंब भिजली सारी धरा वनराई प्रसन्न झाली जरा

या इथे आनंदे फिरूया जरा निसर्गानंद लुटूया खरा ९



श्रीराम पेंडसे

किलबील

किलबील

घंटा झाली, शाळा सुटली

वर्गा वर्गाची दारे उघडली

रडके हसरे चेहेरे घेऊन

मुले मुली बाहेर आली ॥१॥

आई धावली मावशी धावली

बाबा काका मागे राहिले

आपले नेहमीचे सवयी चेहेरे

सर्व चिमुकले शोधू लागले ॥२॥

आज शाळेत काय झालं

आया ताया विचारू लागल्या

सर्व चिमण्या उत्सुकतेने

एक सुरात किलबिलू लागल्या ॥३॥

प्रार्थना शिकवली, गोष्ट शिकवली

आकडे शिकवले अक्षरे शिकवली

नाच झाले, गाणी झाली

खूप खूप धमाल आली ॥४॥

चित्रे काढली, खाऊ खाल्ला

डबा मात्र नाही खाल्ला

नंतर मात्र आम्ही सगळ्यांनी

मस्तपैकी केला कल्ला ॥५॥

काळ

काळ

कालचक्र हे अविरत फ़िरते
चक्र असूनही सरळ जाते
जात असूनही कुणा न दिसते
फ़क्त त्याची गती जाणवते

रहस्य आहे त्याचे विराट
ऒघही त्याचा असे अफ़ाट
होते मानवाची त्यात फ़रपट
हेच आपण जाणावे नीट

भल्या आणि महान विभूती
लहान आणि मोठी पाती
कालौघात ती वाहून जाती
पण त्याला नाही त्याची क्षिती

कुणी न ओळखे या काळाला
कुणासाठीही तो न थांबला
भल्या भल्यांना संपवून गेला
कुणाचेही भय कधी नसे तयाला

असती एक म्हण प्रसिद्ध
आहे काळ औषध सिद्ध
त्यास नाही काही निषिद्ध
होती त्यात सर्वच विद्ध

लहान मोठे घावही शमती
तीव्र सौम्य दु:खेही विरती
महादुर्घटनाही विसरती
अशी आहे काळाची महती

काळतत्वे कुणीतरी मांडली
ती तत्वेही कुणा न कळली
नंतर कळले ती तर चुकली
चूक मात्र कधीही न कळली

गझल

गझल

माझेच प्रतिबिंब मी त्या गझलेत पाहीले
त्या बिंबात माझे, मन चित्त जणू हरवले
माझीच जीव नौका, कशी वेगात भिरभिरे
अती वेग त्या तरेचा, देई तनास शिरशिरे
स्वप्नी ते जगण्याचे, स्वप्न कधिच विरले
वास्तवी अस्तित्वाचे, सत्यच फ़क्त उरले
अश्या या कातरवेळी, अवघे सखेजन जमले
त्या अप्रूप सहवासी, जीवन पुन्हाच फ़ुलले
त्या सर्व न-स्वप्नांना, नव अर्थ स्पर्शू झाला
त्या चित्त विद्ध "मी"चा, मन आत्मा शांत झाला





........श्रीराम पेंडसे

दु:ख

दु:ख

सखी विरहाचे दु:ख नेहमी

सतत ठुस ठुस करत असते

मधुमेहीच्या न भरणार्‍या

जखमेसारखे भळभळत असते ॥१॥



आठवणी काही सरत नाहीत

जखमा काही भरत नाहीत

नको त्या आठवणींचे लोंढे काही

थोपवून धरता येत नाहीत ॥२॥



श्रावण झर झर सरींसारखे

दु:ख....येते, दु:ख.... थांबते

आणि मात्र जाता जाताना

तुमचे मन झाकोळून टाकते ॥३॥



आठवणींची भानगड अशी की,

त्या यायच्या काही थांबत नाहीत

जणू साबणाच्या पाण्यावरचे

बुडबुडे जाता जात नाहीत ॥४॥



दु:ख नेहमीच कसे असते?

भूकंपाने तडकलेल्या जमिनीसारखे

तुमचे रूपडे मात्र दिसते

पाणी नसलेल्या प्रपातासारखे ॥५॥



सुख आणि दु:ख या

एकाच नाण्याच्या बाजू असतात

नेहमी नेहमी हीच नाणी

आपल्याला कधीच सापडत नसतात ॥६॥



ही नाणी नेहमीच घडतात

जग नियंत्याच्या टांकसाळीत

नंतर त्यांची बरसात होताना

थोडीच पडतात आपल्या ओंजळीत ॥७॥



या नाण्यांची खरी गम्मत ही

छाप - कांटा उडवल्यावर दिसते

आपल्या आयुष्यात नेहमी नेहमी

कांट्याचीच बाजू वर येते ॥८॥



मला आधी कळलेच नाही की

नेहमी नेहमीच असे का होते

नाणे उचलल्यानंतर समजले

की दोन्ही बाजूला कांटेच होते ॥९॥



सखीच्या आयुष्यात नेहमीच

कांट्याचीच बाजू वर आली

नंतर नंतर तिला मात्र

त्याची सवयच होत गेली ॥१०॥



सखीच्या मनोवृत्तीने मात्र

कांट्याचे जाईत रूपांतर केले

त्या कंटक पुष्पांनी तिचे

अवघे जीवन सुगंधी केले ॥११॥



सखी सदा झिजत राहीली

रक्तचंदनाच्या खोडा परी

आम्ही मात्र समजलो तिला

जंगली आंब्याच्या लाकडा परी ॥१२॥



दिवस गेले, महीने गेले,

संवत्सरही उलटून गेले

सखी नसण्याचे परीणाम मात्र

अजिबात कमी नाही झाले ॥१३॥



आता मागे वळून पाहताना

सत्य समजू लागले आहे

सखी या जन्मीतरी दिसणार नाही

ही काळ्या दगडावरची रेघ आहे ॥१४॥



तुम्ही म्हणाल की वर्षापूर्वीच

हे सत्य का नाही कळले?

मित्रा, विज्ञान युगातला तू?

इतके तुझे डोके कसे संपले ॥१५॥



अनपेक्षित अश्या त्या धक्क्याने

काळ थबकल्या सारखे वाटले

विचार संपले, मन थांबले

चित्त गोठले, डोके झोपले ॥१६॥



होते असे कधी.... कधी

विचार करून करून होते

यावर मात केलीच पाहीजे

हेच वारंवार जाणवत होते ॥१७॥



अश्या विचित्र कातर क्षणी

जिवलगाची वाट पाहत आहे

उषःप्रभे नंतर येणारा

सूर्योदय मला दिसत आहे ॥१८॥



सूर्याची ती प्रभात किरणें

आनंद सयी जागवतील का?

त्यांच्या सुवर्णमुलाम्याने त्या

चिरंतर ठेवा होतील का? ॥१९॥



अश्या या सुवर्ण ठेवीमुळे

जीवन सार्थकी लागेल का?

या चिरंतर ठेवीच्या व्याजावर

मी जगी उपयोगी असेन कां? ॥२०॥





.............श्रीराम पेंड्से

चित्त विद्ध

चित्त विद्ध

आज दीपावलीच्या शुभ दिनी

मन खूप खूप अस्वथ होतं

तुझ्यासाठी दिवाळी कधीच सरली

हेच जणू ओरडून सांगत होतं ॥१॥



ऐन दिवाळीच्या कानठळी कल्लोळात

जन जल्लोशापासून अलिप्त होतो

मन भावविश्वाच्या अंधारकोषात

केविलवाण्या गटांगळ्या खात होतो ॥२॥



शुभेच्छांचे छोटे छोटे संदेश

मोबाईलवर सारखे किणकिणत होते

मन भावनेच्या कल्लोळात ते

खूपच अर्थहीन भासत होते ॥३॥



शेवटी छापील शब्दच ते

मनोलाटा त्यात दिसतील कशा?

चित्त खळबळाटीचा सारा प्रकोप

मनात पसरला दाहीदिशा! ॥४॥



सगे सोयरे विचारत होते की

आज दिवाळीचे काय काय केले?

काय खरेदी, गोड काय होते?

फराळाचे काय काय खाल्ले? ॥५॥



स्वरात उसने बळ आणून

जाणिवी थरथर लपवत होतो

अमुक अमुक खाल्ले, तमुक केले

सर्वांना हसत खेळत सांगत होतो ॥६॥



सर्व काही ठीक असल्याचा

केविलवाणा प्रयत्न करत होतो

अस्थिर मनाचा दाहक आगलोळ

विझून जाण्याची वाट पाहात होतो ॥७॥



आठवणींचा दरबार भरला होता

आरोपीच्या पिंजर्‍यात उभा होतो

सुखी दु:खी आठवणींनी मात्र

आतल्या आत जळत होतो ॥८॥



त्या आठवणींच्या आगडोंबाची

भली मोठ्ठी ज्योत झाली

काळ्या पांढर्‍या सर्व सयींची

क्षणार्धात राख रांगोळी करून गेली ॥९॥



तरीही डोळ्यातून सुख दु:खाचा

पाणलोटी ओहोळ झरझरू लागला

प्रतिपदेच्या शुभ स्वागतासाठी

चित्तगाभारा रिकामा करून गेला ॥१०॥



आणि मग चंचल चित्ताने जणू

आत्मसंयमिनीचा धावा केला

त्या माउलीने अति तत्परतेने

विद्धात्म्याला प्रतिसाद दिला ॥११॥



संयमिनीच्या सूक्ष्म तरल वृत्तीला

विद्धचिताची थरथर जाणवली

त्या थरथर लाटेतूनच तिने

विद्ध-भग्न वृत्ती शांत केली ॥१२॥



शब्द आणि स्वर लहरी इथे,

आश्वासक आणि कोमल होत्या

संयमिनीच्या वृत्तीसारख्या

धीर-गंभीर आणि तरल होत्या ॥१३॥



श्रीराम पेंडसे

चांद राती

चांद राती



रिमझीम रिमझीम श्रावणसरीत

अंग माझे भिजले गं

सय तुझी येता येता

मन मोहरून आले गं



मन उफाळ वार्‍याच्यासंगे

उंच ऊंच उधळले गं

आठवणींच्या हिंदोळ्यावर

मस्त झुलून आले गं



चांदण्यांची बकुळफुलें मी

तुझ्याचसाठी खुडली गं

त्यांचा मोहक गजरा मी

तुझ्या केसात माळला गं



त्या बकुळीच्या दरवळाने मी

धुंद कुंद झालो गं

तुझ्या गहिर्‍या मिठीत मी

खोल खोल हरवलो गं



तुझ्या विद्युत् स्पर्शाने मी

धुंद स्वप्नी बुडालो गं

तारकांच्या जाईसड्यात मी

आकंठ न्हालो बुडालो गं



माझे घायाळ चित्त तन

तुझ्या नाजुक मिठीत निमाले गं

तुझ्या मलमली स्पर्शाने

ते पार विरघळून गेले गं



तुझ्या माझ्या मिलनास

चंद्र साक्षी होता गं

टिपूर चांद लोटात मी

देह भान विसरलो गं



काळ थांबला, पळे थांबली

पण धुंदी न ओसरली गं

मन माझे हरवून मी

स्वर्गी डुंबत होतो गं





................ श्रीराम पेंडसे

भूत

सूर्य बुडाला ऊजेड निमाला

काळ्या शाईची दौत फुटली

टच्च शांततेच्या टीपकागदावर

मावळतीकडे पसरू लागली



शांत खोल जलाशयावर

गूढ बोचरी शांतता पसरली

पक्शी थांबले, प्राणी लपले

अवघी सृष्टी थिजून गेली



भयाण बोचर्‍या काजळी शांततेत

रातकिडे सुरात किरकिरू लागले

काळ्याकुट्ट काजळरातीने

सार्‍या आसमंतास मिठीत घेतले



त्या जलडोहाच्या काठावरती

वट वृक्षांच्या मजल्यांवरती

सर्व अतृप्त भुतावळींची

विराट महासभा भरली होती



कुणाची कुजबुज, फिदीफिदी हसणे

आरडा ओरडा, भयाण रडणे

सर्व भुतांचे तारस्वरांचे

गर्जू लागले एकसुरी तराणे



आणि अचानक फटक्यासरशी

आसमंत सारा गोठून गेला

संथ संथ मंद पदरवाचा

काळ्या काचेला तडा गेला



टॉक्ss टॉक्ss टप्ss टप्ss

पदरव तिथे शांत ssझाला

बुळुकss डुबुकss गूढ आवाज

ताणलेल्या शांततेला चिरत गेला



अरे ss बापरे ss लई भारी

आपल्यापेक्षा आहे कोणीतरी

महासमंधराज आला वाटतं

कबंधे पाहती भिरी भिरी



पुन्हा बुळुकss पुन्हा डुबुकss

पिशाच्च दुनिया टरकून गेली

असंख्य वट-पारंब्यांवर

उलटी होऊन लटकू लागली



आणि अचानक सारा परिसर

लख्ख उजेडाने नाहून गेला

मोठ्ठा विजेचा डोंब लोळ

आसमंती कल्लोळ माजवून गेला



पाऊस कोसळला आभाळ फुटले

वातावरण धुंद धूसर झाले

काळ्या गडद जलपृष्ठावर

ढोल ताशे वाजू लागले



निसर्गाचे तांडव पाहून

सारी भुते पसार झाली

जलप्रपाती त्या प्रकोपात

गूढ छाया एकटी राहीली



टॉक्ss टप्ss नादाचा स्वामी

वट-तरूंच्या आश्रयास गेला

जलतांडवातून सुटकेसाठी

काळोखी ढोलीत जाऊन बसला



घटीका गेल्या पळे चालली

पाऊस बदाबद कोसळतच होता

ढोलीमधला अस्वस्थ आत्मा

तास मिनीटे मोजतच होता



अखेर पाऊस कंटाळून थांबला

निसर्ग प्रकोप शांत झाला

तिकडे उगवतीच्या गालांवरती

मंद रक्तिमा पसरू लागला



रविकिरणांच्या आगमनाने

तरूवर सोन्-नुलामा पसरला

कोवळ्या मृदू किरण उबेने

अवघा आसमंत लपेटून गेला



काळ्या ढोलीतून हळू हळू

एक वाटसरू बाहेर आला

आळोखे पिळोखे देत देत

सृष्टी बहर न्याहाळू लागला



जलाशयावर तजेला होऊन

आदीदेवास वंदन करून

शांत शांत पावले टाकत

परतीची वाटचाल करू लागला





श्रीराम पेंडसे

आरोग्यम् धनसंपदा १२ - पाठदुखी उपचार भाग २

आरोग्यम् धनसंपदा १२ - पाठदुखी उपचार भाग २
मागच्या लेखात पाठदुखीच्या आणि मानेच्या विकारांच्या उपचारांच्या संदर्भात आपण आयुर्वेदिक औषधोपचार, पथ्यापथ्य विचार पाहीले. या आणि या पुढील भागातून आपण यावरील योगोपचार पहाणार आहोत. मी मागेच सांगितले होते त्याचा पुनःरुच्चार करतो. या लेखमालेत शस्त्रकर्म याचा विचार केलेला नाही. कारण या लेखमालेचा तो हेतू नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे असे की मला शस्त्रकर्म याविषयावर लिहीण्याचा अधिकार नाही असे मला वाटते. तसा विचार केल्यास योगोपचार यावरही लिहायला मला अधिकार आहे की नाही माहीत नाही. पण मला जी माहिती आहे ती मी सांगणार आहे. तुम्ही त्यातले जे जमेल ते, आणि जमेल तसे पडताळून पाहून स्विकारायचे आहे. असो. आपण मागच्या लेखात पाहिले होते की या व्याधीवर सर्वसामान्यपणे विश्रांती देऊन मणक्यातली हालचाल थांबवणे, वेदनाशामक औषधे, कमरेला व मानेला बेल्टस् व काही पथ्ये वगैरे उपचार केले जातात. आणि आपण हेही पाहिले होते की या उपचारांना मर्यादा आहेत. आयुर्वेदिक औषधे दीर्घकाळ घेता येतात पण परीणाम व्हायला खूप वेळ लागतो. ऍलोपाथीची औषधे दीर्घकाळ घेता येत नाहीत. त्यांचे वाईट परीणाम होतात. तिच गोष्ट विश्रांतीची आहे. तिचे वाईट परीणाम होत नाहीत पण विश्रांती दीर्घकाळ घेता येत नाही. आपापले उद्योग, व्यवसाय यामुळे विश्रांती किती काळ घ्यायची याच्यावरही मर्यादा येतात. आणि मग या सर्वातून आपण हे दुखणे एकदाचे कायमचे संपवावे म्हणून शस्त्रक्रियेपाशी येऊन पोहोचतो. आपल्याला आधुनिक तज्ञ सांगतात की शस्त्रक्रिया याशिवाय आता इलाज नाही. शस्त्रक्रियेने दुखणे कायमचे जाईल. शस्त्रक्रियेच्या मर्यादा सांगितल्या जात नाहीत. कधी कधी असेही सांगितले जाते कि शस्त्रक्रिया करून पाहू. उपयोग झाला तर झाला. पण रूग्णाची अवस्था इतकी वाईट झालेली असते आणि तो इतका हतबल झालेला असतो, की तो म्हणतो, "काय वाटेल ते करा पण माझी यातून सुटका करा." शस्त्रक्रिया या विषयात मी तज्ञ नाही हे मी आधी सांगितले आहेच, पण मला जे माहित आहे ते सांगतो. या शस्त्रक्रियेला आधुनिक वैद्यकात "डिकॉम्प्रेशन" असे गोंडस नाव आहे. यात सरकून बाहेर आलेल्या चकतीचा भाग कापून काढतात. म्हणजे ज्यामुळे कॉम्प्रेशन आले आहे ते कारण दूर केले जाते. पण त्यामुळे स्नायूंची बिघडलेली संरचना सुधारत नाही. पाठीच्या कण्याला असलेला नैसर्गिक बाक वेडावाकडा झालेला असतो. तो काही शस्त्रक्रियेने जात नाही. मग रुग्ण झोपून आहे, विश्रांती घेत आहे, तोपर्यंत ठीक असते. हालचाल सुरू झाली की, पुन्हा गाडी मूळपदावर येते. अशावेळी डॉक्टर म्हणतात की, "मी आधीच सांगितले होते कि शस्त्रक्रिया करून पाहू. उपयोग झाला तर झाला." मग रूग्णाला असे वाटू लागते की शस्त्रक्रियेने काही उपयोग झाला नाही. पैसा वाया गेला असेही वाटू लागते. मूळ कारण तसेच राहते. आणि मग ती व्याधी पुन्हा पुन्हा उपटते. पण योगोपचारात व्याधीचे परीणाम दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. स्नायूंची बिघडलेली संरचना सुधारण्याचा प्रयत्न करतो.

मग काय केले पाहीजे? कोणते तत्त्व स्विकारले पाहीजे? तर मूळ कारणावर मात केली पाहीजे. पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक वक्रतेत झालेला बिघाड सुधारला पाहीजे. पाठीच्या कण्याच्या विकृत वक्रतेत बदल केला पाहीजे. पाठीच्या कण्याची बिघडलेली वक्रता पुन्हा नैसर्गिक केली पाहिजे. मग हे कसे होणार? कसे करायचे? काय करायचे? तर स्पर्श, दाब, वेदना, घर्षण तपमानात होणारी वाढ आणि नाश ही साखळी उलट झाली पाहीजे. म्हणजे घर्षण कमी झाले पाहीजे, त्यासाठी दोन मणक्यातले अंतर वाढले पाहीजे. त्यासाठी स्नायूंची लांबी वाढली पाहीजे. पाठीच्या कण्याची नैसर्गिक वक्रता परत आणता आली पाहीजे. आपल्या रोजच्या जीवनात पाठीच्या कण्याची नैसर्गिक अवस्था बिघडलेली असते. प्रत्येक सांध्याची हालचाल करणारे स्नायूंचे दोन गट असतात, जे ऐकमेकांच्या विरुद्ध दिशेने हालचाल करतात. त्यात समतोल असला की आपोआपच शरीराची बैठक, हालचाल सुधारते. जेंव्हा पाठदुखीचा रुग्ण तिरपा उभा राहतो, तेंव्हा त्याच्या या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काम करणार्‍या स्नायूंचे संतुलन बिघडलेले असते. त्याचे ते तसे उभे राहणे, हे त्याने आपल्या वेदनेचे शमन करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या नकळत परीस्थितीशी जुळवून घेण्यातून आलेले असते. हळूहळू तीच त्याची नैसर्गिक अवस्था व्हायला लागते. कमरेतल्या कण्याची वक्रता वाढली किंवा सपाट झाली तर पाठदुखी सुरू होते. आणि हे थांबवायचे असेल तर ती पाठीच्या कण्याची नैसर्गिक वक्रता परत आणता आली पाहीजे. आणि हे योगोपचाराने शक्य आहे. हेच पाठदुखीसाठीच्या योगोपचाराचे तत्त्व आहे. पाठदुखीचे योगोपचार आणि मानेकरिता योगोपचारात बराच फरक आहे. म्हणून या लेखात फक्त पाठदुखीचा विचार केला आहे. मानेतील मणक्याच्या व्याधीवरील उपचार पुढील लेखात पाहू.

ही लेखमाला लिहीताना मी वारंवार एका गोष्टीचा इशारा दिला होता. यापूर्वीचे लेख ज्यांनी वाचले नाहित आणि हा लेख नव्याने वाचत आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, की त्यातील उपचार हे तुमच्या माहितीसाठी आहेत. हे वाचून आणि चित्र पाहून करण्याचा प्रयत्न करू नये. ते करताना एखाद्या तज्ञ योगशिक्षकाकडून शिकून घ्यावेत. त्या शिक्षकासमोर ते काही महिने करावेत. म्हणजे आपण करत आहोत ते बरोबर आहे का हे कळेल. अन्यथा कुठे चुकीच्याठिकाणी ताण बसला तर व्याधी बरी व्हायच्या ऐवजी भलतेच होऊन बसेल. म्हणून मुद्दाम ही धोक्याची सूचना देत आहे. यासंबंधी पुढे दिलेल्या पत्त्यावर किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास अधिक माहिती अधिकृतरीत्या मिळेल या सर्व व्याधींवरचे उपचारही तेथे दिले जातात याची कृपया नोंद घ्यावी.



संजीवन योग फाउंडेशन

कबीरबाग मठ संस्था

५१, नारायण पेठ

पुणे ४११ ०३०

दूरध्वनी : ०२०-२४४५०१८१, २४४८४४२३, २४४८०४२४

फॅक्स : ०२०-२४४८१९३७

इ मेल : drkarandikar@hotmail.com



मग यासाठी योगोपचाराचा क्रम कसा असला पाहिजे ते पहा. सर्वप्रथम कमरेला ताण (Lumber Traction), पादांगुष्ठासन, पाठीच्या कण्याला पिरगळण्याचा ताण(Rotational Stretch to Spine or Twisting), शशांकासन आणि सगळ्यात शेवटी शवासन हा असा क्रम असला पाहीजे. आणि व्यवस्थित हे शिकून घेतल्यनंतर आठवड्यातून किमान एक दिवसा आड एक असे, तीन दिवस प्रत्येकी एक तास असे केले गेले पाहिजे. यानंतर विचारला जाणारा अतिशय लोकप्रिय प्रश्न म्हणजे हे आम्हाला किती दिवस करावे लागेल? याचे मी मागे उत्तर दिले होते. परत एकदा सांगतो. ही आसने, हे उपचार हा आपल्या दिनचर्येचा भाग झाला पाहिजे. मागे मी म्हटल्याप्रमाणे आपण अंघोळ रोज करतो. तो अपल्य दिनचर्येचा एक भाग आहे. आपण जिवंत आहोत तो पर्यंत. तसे ही योगसने ही कायम करण्याची गोष्ट आहे. नैमित्तीक नाही. तरच त्याचे कायमस्वरूपी परीणाम दिसतील.

पाठीच्या कण्याचा ताण : (आता सर्वप्रथम पाठीच्या कण्याच्या ताणाबद्दल पाहू या. हा ताण म्हणजे Lumber Traction. आधुनिक वैद्यकात दिले जाणारे Traction आणि योगोपचारातले Traction ताय फरक आहे. इथे रुग्णाच्या कमरेला दोर बांधून तो दोर भिंतीतल्या हूकला अडकवला जातो. (चित्र क्र.१) चित्रात तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती पायाने भिंत ढकलत आहे. डाव्या आणि उजव्या बाजूचे संतुलन संभाळत ती व्यक्ती स्वतःचे स्वत:च Traction घेत आहे.त्यामुळे कमरेच्या मणक्याच्या स्नायूंची लांबी हळू हळू वाढते आणि चेतांवरील दाब नाहीसा होतो. हेच Traction दोर न लावताही घेता येते. चित्रात तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती भिंतीला टेकून उभी आहे. रूग्ण जमिनीवर उताणा झोपलेला असून भिंतीला टेकून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या गुढघ्यावर जोर देत आहे. यात खुब्याच्या सांध्यातून Traction दिले जाते. आणि यात कोणत्याही प्रकारचा अतिरीक्त ताण मणके किंवा चेतांवर येत नाही. (चित्र क्र.२)

शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. एक म्हणजे शरीराची ठेवण करणारे (Structral), बैठक निर्माण करणारे (Postural), आणि हालचाल करणारे (Movement).या सर्वाना पूर्ववत नैसर्गिक अवस्थेत आणणे हे योगशास्त्राचे धेय्य आहे. मग यावर काम करणारी आसने आता पाहू.

पादांगुष्ठासन : कधी कधी मांडीच्या मागिल बाजूने विजेचा शॉक बसल्यासारख्या वेदना सुरू होतात. याला "सायटिका" म्हणतात. बैठे काम सतत करण्याने मांडीचे स्नायू आखडून जातात. आणि त्यामुळे सायटिक चेता (Nerve) दाबली जाते. या आसनामुळे मांडीच्या मागच्या स्नायूची लांबी वाढते.मैदानी खेळ खेळणार्‍या खेळाडूंना याची गरज भासते. कारण त्यांचे मांडीत असलेले "Hamstring" या नावाचे स्नायू नेहमीच आखडतात. हे आसन करताना चित्रात दाखवल्याप्रमाणे भिंतीला काटकोनात झोपावे. (चित्र क्र. ३) दोन्ही पावले भिंतीला टेकून ठेवावी. नंतर उजवा पाय गुढग्यात दुमडून पोटाजवळ घ्यावा. दोन्ही हातानी पाऊल पकडून ठेवावे. मांडी भिंतीला समांतर ठेवत संपूर्ण पाय भिंतीला समांतर करण्याचा प्रयत्न करावा. त्याच वेळी कमर आणि कुल्ले जमिनीवर घट्ट टेकवून ठेवावेत. जर हाताने पाऊल पकडणे जमत नसेल तर चित्रात दाखवल्याप्रमाणे पावलाभोवती दोर किंवा मुलीची पंजाबी ड्रेसची ओढणी गुंडाळावी. आणि पाय गुढ्ग्यातून सरळ करत मांडीसह संपूर्ण पाय भिंतीला समांतर करण्याचा प्रयत्न करावा.

मेरूदंडासन : म्हणजे पाठीच्या कण्याला पिरगळणारा ताण. A Rotational Stretch to Spine or Twisting. चित्रात दाखवल्याप्रमाणे भिंतीजवळ दोन्ही गुढग्यावर बसावे. पावले पालथी ठेवावीत. (चित्र क्र.४) हळूहळू गुढग्यावर उभे राहत डावा गुढगा आणि पाऊल तसेच ठेवत उजवे पाऊल जमिनीवर टेकवावे. आणि मांडी जमिनीला समांतर आणि पाय काटकोनात ठेवत श्वास घेत घेत दोन्ही खुब्यातून धड घट्ट धरून ठेवत पोट छाती मान उजव्याबाजूला वळवावे.या ताणामुळे पाठीच्या कण्याला लवचीकपणा येतो. मणक्यातून बाहेर येणार्‍या चेतांवरचा ताण नाहिसा होतो. ज्याना गुडघेदुखीचा त्रास आहे त्याना हे आसन लोखंडी खुर्चीवर बसूनही करता येते. यात चित्रात दाखवल्याप्रमाणे खुर्ची भिंतीकडे पाठ करून ठेवा.आणि त्यात चित्रात दाखवल्याप्रमाणे बसावे. पाय काटकोनात ठेवावेत. पोट चित्रात दाखवल्याप्रमाणे खुर्चीच्यापाठीला टेकवून ठेवावे. मांडी हलू नये म्हणून एक ब्लँकेटची घडी मांडी आणि खुर्चीची दांडी यात ठेवावी म्हणजे दोन्ही मांड्या स्थिर राहतील. उजवा हात दुमडून खुर्चीची कड पकडा. (चित्र क्र.५) डावा हात पाठीवर ठेवा. आणि शरीर कमरेतून हळू हळू डावीकडे, बाटलीचे फिरकीचे झाकण आपण उघडतो तसे फिरवायला सुरूवात करा. आणि संपूर्ण पाठीचा कण उभ्या अक्षाभोवती ९० अंशात वळवा (Rotation around the vertical axis). हीच क्रिया शरीराच्या विरूद्ध बाजूला करा. हीच क्रिया उभे राहूनही करता येते. त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पाय जमिनीला समांतर ठेवावा. त्यासाठी घरच्याघरी करायचे असल्यास टीपॉयवर किंवा डायनिंग टेबलावर किंवा स्टूलावर पाय जमिनीला समांतर ठेवावा. जमिनीला पाय समांतर राहण्यासाठी आवष्यकता असेल तर पायाखाली उशी किंवा चादरीची घडी ठेवावी. आणि जो पाय वर आडवा ठेवला असेल त्याबाजूला शरीर कमरेतून चित्रात दाखवल्याप्रमाणे वळवावे. (चित्र क्र.६)

शशांकासन : या आसनात पाठीचा कणा खुब्याच्या सांध्यातून पुढे आणावा लागतो. (चित्र क्र,७) त्यासाठी खिडकी असलेल्या भिंतीकडे पाठ करून गुडघ्यावर बसावे. पुढे सरकू नये म्हणून कमरेला दोर लावावा. आपल्यासमोर लोड उभा ठेवावा. सरळ बसून हात वर न्यावेत. आणि मग कमरेतून वाकत पुढे जात पोट व छाती लोडावर टेकवावे. ही कृती करताना सर्व हालचाल खुब्याच्या सांध्यातच झाली पाहीजे या कडे लक्ष ठेवावे. पाठीला पोक येऊ देऊ नये. सामान्यपणे सांगितले जाते की पाठीचे दुखणे असताना पुढे वाकू नये. मग शशांकासनात तर नेमके तेच आहे. मग खरे काय? दॉक्ट्र सांगततकी पुढे वाकू नये म्हणजे पाठीच्या कण्यात बाक आणू नये असे आहे. पण आपल्या आसनात खुब्याच्या सांध्यात हालचाल घडवणे हा हेतू आहे. पाठीच्या कण्यातून वाकणे तिथे अपेक्षित नाही. त्यामुळे त्यात पाठीच्या कण्यावर कुठेच ताण येत नाही.

अश्या तर्हेने आपण पाठीच्या कण्याविषयी लागणारे उपचार पाहीले. पुधील लेखात आपण मानेच्या दुखण्यावरचे योगोपचार पाहूया.





ॐ तत्सत्





श्रीराम पेंडसे



डिसेंबर २००९

आरोग्यम् धनसंपदा - ११ : पाठ दुखी आणि मान दुखीचे उपचार -भाग १

आरोग्यम् धनसंपदा - ११ : पाठ दुखी आणि मान दुखीचे उपचार -भाग १

मागच्या लेखात आपण पाठदुखीची कारणे, आणि लक्षणे पाहिली होती. आणि त्यादष्टीने शरीर रचनेचाही विचार केला होता. त्यावेळी त्यात मान दुखी आणि गुडघेदुखी यांचा समावेश केला नव्हता. पाठ दुखी, गुडघे दुखी आणि मान दुखी यांच्या योगोपचारात फरक असतो. म्हणजे या तिन्हीवर वेगवेगळे उपचार आहेत. पण आयुर्वेद आणि आहारातील पथ्यापथ्य, दिनचर्या किंवा आधुनिक उपचार यांचा विचार करता फारसा फरक नाही. म्हणून मला असे वाटले की उपचारांची चर्चा करण्यापूर्वी मान दुखी आणि गुडघेदुखी याच्याही कारणे आणि लक्षणे यांचा विचार व्हावा. आणि म्हणून उपचार, दिनचर्या यांची चर्चा करण्याआगोदर या मणके आणि हाडांच्या या दुखण्यात मान दुखी आणि गुडघेदुखी याचा विचार आधी करू. आणि मग उपचारांबद्दल पाहूया.

मानेच्या दुखण्याचा विचार करताना आधी त्याची रचना पाहू. आणि मग या दुखण्याचे परीणाम कुठे कुठे होतात ते पाहू. मानेत एकंदर सात मणके असतात. आणि पाठीच्या मणक्याप्रमाणे दोन मणक्यात छोटीशी रबरी चकती असते. मानेतल्या मणक्यातले सर्वात वरचे दोन मणके यांना महत्त्व आहे. कारण पहिला मणका, ज्याला Atlas असे म्हणतात, त्यावर मस्तक तोललेले असते. हा मणका एखाद्या रिंगसारखा असतो. त्याच्या खालचा दुसरा मणका जो असतो, ज्याचे नाव आहे Axis, तो या पहिल्या मणक्याला तोलून धरतो. तो दिसयला एखद्या विट्टीच्या टोकासारखा असतो. आणि हे टोक त्या पहिल्या मणक्याच्या रिंगसारख्या भागात एखाद्या दरवाज्याच्या कडीसारखे जाऊन बसते, आणि एखाद्या पाचरेसाखे काम करते. याला Atlanto Axial Joint म्हणतात. आणि या रिंगमधून मुख्य मज्जारज्जू जातो. सहसा या पहिल्या दोन मणक्यातल्या सांध्याला काही इजा होत नाही. फक्त अपवाद एखाद्या जबर अपघाताचाच. मानेच्या दुखण्यांची रोजच्या व्यवहारामुळे जी देणगी आपल्याला मिळते त्यात सहसा तिसर्‍या ते सातव्या मणक्यात दोष निर्माण होतो. पहील्या दोन मणक्यात नाही. या मानेतल्या मणक्यात दोष निर्माण झाला की त्याचा परीणाम मानेच्या हालचालीवर, खांद्याच्या हालचालीवर आणि हाताच्या हालचालीवर होतो.

आता आपण याची कारणे पाहू. कारणांमधे, मणक्यातील अंतर कमी-जास्त होणे, मणके झिजणे, मणके एकावर एक चढणे अशी कारणे असतात. ही व्याधी व्यवसायाभिमुख आहे. म्हणजे कारकुनी काम करणारे, कॉम्पुटरसमोर बसून तासनतास काम करणारे, आचारी, पुढे वाकून काम करणारे, सतात वाहन चालवणारे अशांना हा त्रास अधिक होतो. रोज दीर्घकाल वाहन चालवणार्‍यात दोन चाकी चालवणार्‍यांना सहसा पाठदुखी होते आणि चार चाकी चालवणार्‍यांना मानेचे दुखणे होते. कारण त्यामानाने, दुचाकी वाहनांची धक्केरोधक यंत्रणा (Shock Absorbers) ही त्यामानाने कमजोर असते. म्हणजेच रस्त्यातील खड्ड्यांचा पाठीच्या मणक्यावरील विपरीत परीणाम हा दुचाकीस्वारांच्यात अधिक प्रमाणात दिसतो. कारकुन मंडळी किंवा कॉम्पुटरवर काम करणार्‍यांच्यात वर्षानुवर्षे सतत एकाच अवस्थेत मान कलती राहील्याने ती दुखायला लागते.

लक्षणांच्यात मान दुखणे, खांदे दुखणे, खांद्याच्या हालचालींवर मर्यादा येणे, दंड दुखणे, कोपर दुखणे. हाताला, हाताच्या बोटांना मुंग्या येणे, डोके दुखणे, चक्कर येणे असे प्रकार होउ लागतात. कधी कधी हात जड होतो, बधीरता येते, हात अवघडल्यासारखा होतो. खांदे दुखतात. हाताच्या खांद्यातून हालचालीवर मर्यादा येते. हात वर जात नाही. आपण कसा डोक्यातून शर्ट काढतो तसा अजिबात काढता येत नाही. या सर्वांच्या जोडीला सामान्यपणे तीव्र वेदना असतात.

आता यावरील उपचाराची दिशा पाहूया. यात औषधॉपचार आणि इतर उपचार (Non distructve), आणि शस्त्र कर्म (distructve) असे दोन भाग असतात. यातला शस्त्र कर्म हा भाग आत्ता तरी यालेखाचा हेतू नाही आणि तूर्तास आपल्या लेखमालेच्या हेतूशी विसंगत आहे. शिवाय शस्त्र कर्म या विषयावर मतप्रदर्शन करण्याचा मला कोण्ताही नैतिक अधिकार नाही. म्हणून मी त्यावर काही भाष्य करणार नाही. Non distructve उपचारात बर्‍याच वेळी विश्रांतीने फरक पडतो. पण विश्रांती ही सध्याच्या वेगवान आणि व्यवसायाभिमुख युगात सहसा शक्य नसते. व्यायाम किंवा आसने हाही उपाय आहे. पण तो भाग आपण पुढच्या लेखात पाहू. औषधी उपचारात मान दुखी आणि पाठ दुखी या दोन्हीवर उपचार सारखेच असतात. प्रथम बाह्य उपचार पाहू या. यात प्रामुख्याने लेप अणि तेलचे मर्दन असते. लेप गोळी किंवा "दु:ख दबाव लेप" या नावने हा लेप बाजारात मिळतो. भुकटीच्या स्वरूपात किंवा गोळीच्या स्वरूपात हा मिळतो. भुकटी असेल तर पाण्यात कालवून त्याचा दाट गंधासारखा लेप करवा. लोखंडी पळीत घेउन तो अगदी जेमतेम सोसवेल-सोसवणार नाही इतपत गरम करून दुखर्‍या भागावर लावावा. तेलाने मर्दन करायचे असल्यास महानारायण तेलाचा मसाज करावा. मसाज करताना चोळण्याची दिशा नेहमी खालून वर म्हणजे हृदयाच्या दिशेने ठेवावी. मान किंवा पाठीचे दुखणे खूप तीव्र असेल तर. महानारायण तेलात गवती चहाचा अर्क (Lemon grass Oil) मिसळून त्याचा मसाज करावा. मसाज करताना हलक्या हाताने मसाज करावा. लावलेले तेल जिरवावे. साधारण १०० मि.ली. महानारायण तेलात ५ मि.ली. अर्क मिसळावा.

पोटात औषधे घेताना प्रधान औषध आहे लाक्षादी गुग्गुळ. शिवाय सिंहनाद गुग्गुळ हे औषध सूज, व दु:ख कमी करण्यासाठी उपयोगी असते. त्रिफळा गुग्गुळ हे ही औषध सूज करण्यासाठी वापरतात. या सर्वाच्या जोडीला जे अशक्त आहेत त्यांनी अस्कंद चूर्ण घ्यावे. किंवा अश्वगंधा पाक घ्यावा. ज्यांना हाताला मुंग्या येतात त्यानी लाक्षादी वटीसह संधीवातादी वटी, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी या गोळ्या घ्याव्यात. मी मागे सांगितल्याप्रमाणे गोळ्या कुटून पाण्याबरोबर, मधातून घ्याव्यात. गिळू नयेत. पाठ दुखी ही मूतखड्यामुळे आहे असे असेल तर गोक्षुरादि गुग्गुळ आणि रसायन चूर्ण घ्यावे. पोटात वायू धरल्याने पाठ दुखत असेल तर सौभाग्य सुंठ, अभयारिष्ट, आणि एरंडेल तेलाची पोळी याचा उपयोग करावा. जर वजन हिसक्याने उचलल्यास पाठीत उसण भरते. अशावेळी विश्रांती घ्यावी, गरम पाणी प्यावे. कमरेच्या मणक्यात झीज असेल तर एरंड पाक आणि काल्शा चूर्ण वापरावे.पाठीचे दुखणे असणार्‍यांनी आपल्या नेहमीच्या जेवणात आले, पुदिना आणि लसूण यांच्या चटणीचा वापर करावा. याच्या पथ्यापथ्याचा विचार करताना थंड पदार्थ, दही केळे, किंवा केळ्याची शिकरण, फरसान , मिठाई, मांसाहार, अंडी, मीठ पापड हे पदार्थ टाळावेत. आणि अपुनर्भव चिकित्सेत म्हणजे दुखणे टाळण्याच्या दृष्टीने त्रिफळा गुगूळ, गोक्षुरादि गुग्गुळ, आणि लाक्षादि गुग्गुळ याचा वापर करावा.

या पुढच्या लेखात आपण यावरील योगोपचाराचा विचार करू.

ॐ तत्सत्



श्रीराम पेंडसे

अंतर्याम नोव्हेंबर २००९