रविवार, २० सप्टेंबर, २००९

आरोग्यम् धनसंपदा - १० : पाठ दुखी

मागच्या लेखात आपण दमा किंवा श्वासाचा विकार पाहिला होता. आजच्या वेगवान आणि वेळेचा विचार न करता काम करण्याच्या युगात आणखी नेहमीच आढळणारी व्याधी म्हणजे पाठ, कंबर दुखी, मान दुखी. विषयाचा आवाका तसा मोठा आहे. त्यामुळे या भागात आपण पाठ व कंबरदुखी याचे स्वरूप कारणे याचा विचार करू. (मानदुखी याचा विचार नंतर स्वतंत्ररीत्या करू.) यावरचे योगावर आधारलेले उपचार आणि इतर उपचार याचा विचार पुढच्या भागात करू.

आपल्या कामाची पद्धत, आपली बैठक, त्या अवस्थेत किती वेळ बसून राहतो यावर त्या व्याधीची तीव्रता अवलंबून असते. आजच्या युगात सर्वसामान्यपणे आढळणारी ही व्याधी आहे. या लेखात आपण पाठदुखी/कंबर दुखी याचा विचार करू, आणि मानदुखी यावर नंतर पाहू. पाठदुखीवरचे उपचार पाहण्यापूर्वी प्रथम पाठदुखी म्हणजे नक्की काय ते पाहू. ढोबळमानाने पाठदुखी म्हणजे छातीचा मागचा भाग, कंबर कुल्ले या अवयवात सतत किंवा अधून मधून वेदना होणे. पाठदुखी किंवा वेदना म्हणजे तरी काय? तर त्या ठिकाणचे स्वास्थ्य बिघडणे. तिथे काहीतरी बिनसल्याची जाणिव होणे.

पाठीच्या कण्याला दुखापत होणे हे महत्त्वाचे कारण आहे. बर्‍याचवेळा काय कारणाने पाठ दुखायला लागली ते कळतही नाही. आपपण वाहन चालवताना खड्ड्यातून वाहन गेले तर पाठीच्या मणक्याला दुखापत होऊ शकते. काही काही रस्त्यांवर स्पीड ब्रेकर्सचा अतीरेक असतो. हे स्पीड ब्रेकर्स हे "बॅक ब्रेकर्स" आहेत. खेळाडूना पाठीची दुखापत लवकर होण्याचा संभव असतो. उदाहरणार्थ क्रिकेटमधे वेगवान गोलंदाजाना पाठीचे दुखणे लवकर लागू शकते.

काम करताना आपली बसण्याची पद्धत ही सुद्धा बर्‍याचदा कारणीभूत असते. आपण बसताना पोक काढून बसतो. कारकून खुर्ची आणि टेबल यांच्या उंचीचे प्रमाण कधी कधी योग्य नसते. त्यामुळेबसण्याची वेडीवाकडी स्थिती होते. संगणकासमोर बसून काम करताना बर्‍याच वेळा खुर्ची गोल फिरणारी असते. किंवा खुर्चीत बसून काम करताना एखादा कागद किंवा काहीही वस्तू हवी असल्यास ती खुर्चीवरून न उठता वेडे वाकडे हात वारे करून घ्यायची सवय लागते. किंवा काही वेळा आपण बसलेलो असताना एखादी वस्तू वार्‍याने म्हणा किंवा इतर कारणाने पडायला लागली असताना आपण अचानक घाई घाईने हालचाल करतो. आणि हात वळवून ती वस्तू चटकन धरण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी स्नायूंची वेडी वाकडी हालचाल झाल्याने ते लचकतात. एखादी जड वस्तू उचलताना ती योग्य पद्धतीने उचलली गेली नाही तर पाठीत उसण भरू शकते. आपण उत्साहाच्या भरात उचलायला जातो. वजन उचलायचे असल्यास किंवा ढकलायचे असल्यास ते एका विशिष्ट पद्धतीनेच उचलावे लागते. तरच पाठीच्या कण्याला त्रास होत नाही. अन्यथा पाठीच्या कण्याला दुखापत होते. मणका सरकणे, त्यातील अंतर कमी होणे वगैरे प्रकार होतात.

पाठदुखी आणि कंबरदुखी यावरईल उपचार पाहण्या पूर्वी त्यामागचे शरीरशास्त्र पाहूया. आपण कोणत्याही स्थितीत असलो तरी गुरूत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरावर दाब पडत असतो. त्यात पाठीच्या कण्यावर येणारा दाब हा उभ्या, बसलेल्या आणि झोपलेल्या अवस्थेत निरनिराळा असतो. झोपलेल्या अवस्थेत ७ कि. ग्रॅ. दर चौ. सें.मी, उभे असताना १० कि. ग्रॅ. दर चौ. सें.मी आणि बसलेल्या अवस्थेत १५ कि. ग्रॅ. दर चौ. सें.मी असा असतो. म्हणजेच बसलेल्या अवस्थेत दाब सर्वाधिक असतो. हल्लीच्या आधुनिक जीवनात बैठे काम अधिक असते. आणि म्हणून ज्यांना बैठे काम अधिक करावे लागते त्यांना पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आणि म्हणून हल्ली पाठदुखीचे प्रमाण अधिक वाढले आहे. आपल्या पाठीच्या कण्यात एकूण ३३ मणके आहेत. ते एकमेकांवर एखाद्या लगोरीसारखे रचलेले असतात. आणि ते स्नायुंच्या सहाय्याने पक्के बांधलेले असतात. त्याची सहजा सहजी मोड तोड होत नाही. आपल्या मानेत सात मणके, छातीत बारा मणके, कमरेत पांच, कटीबंधात पांच तर शेपटात चार मणके असतात. उत्क्रांतीच्या ओघात शेपूट गळून गेली. आणि त्यामुळे शेपटीतले मणके हे एकमेकांना जोडले गेले. आता यात कमरेतले पांच मणके हे रूंद आणि मोठे असतात. त्यामुळे ते जास्तीत जास्त दाब सहन करू शकतात. वजन पेलू शकतात. तिथली हालचाल ही वळणे, वाकणे अशा प्रकारची असते. म्हणून पाठ दुखत असताना डॉक्टर सांगतात की, "फार वळू नका, पुढे वाकू नका" छातीतले मणके मध्यम आकाराचे असतात. त्यामधे त्यामानाने वळण्याची हालचाल जास्त आहे. मानेतले मणके हे सर्वात लहान. त्यामुळे त्यात हालचाल मुक्त असते. पण मग ते तसे नाजूकही असतात. जेंव्हा मूल जन्माला येते तेंव्हा त्याचा पाठीचा कणा हा एखाद्या दोरीसारखा सरळ असतो.पण नंतर मूल जसे डोके वर उचलू लागते तस मानेत कणा पुढील बाजूने वक्र व्हायला लागतो. आणि अशा तर्हेने वय वाढायला लगले की कणा पूर्णपणे विकसित होताना छातीच्य भागात पुढील बाजूने आंतर्वक्र व कमरेच्या भागात पुढील बाजूने बहिर्वक्र होतो. दोन मणक्यामधे एक रबरी चकती सारखी वस्तू असते. ती चकती एखाद्या शॉक ऍबसॉर्बरसारखे काम करते. त्यामुळे धक्के अधिक चांगल्या प्रकारे सहन केले जातात. या मणक्यातील छिद्रातून चेता बाहेर पडत असतात. आता हा पाठीचा कणा मांडीतल्या हाडामधे म्हणजेच खुब्यातल्या सांध्यामधे एखाद्या उलट्या लंबकासारखा आहे. त्यामुळे यात पुढे वाकणे ही क्रिया नैसर्गिक आहे. मागे वाकणे ही क्रिया मर्यादीत आहे.

आधुनिक जीवनशैलीत आपाण या खुब्याच्या सांध्यात असलेली हालचाल, तिथले स्थितीस्थापकत्व घालवून बसलो आहोत. सर्व सामान्यपणे असे दिसून येईल की पुढे वाकताना आपण कमरेतून वाकण्याच्या ऐवजी गुढघ्यातून वाकतो. कंबर स्थिर ठेवून संपूर्ण कणा पुढे किंवा मागे नेणे हे होत नाही.कण्याच्या व्याधी सुरू होण्याचे मुख्य कारण म्हणजे कण्याची हालचाल जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. वाकडी तिकडी करतो. उदहरणासाठी आपण असे पाहूया की एक व्यक्ती बँकेत कारकून आहे.त्या व्यक्तीला सतत उजवा हात पुढे घेउन काम करावे लागत आहे. असे झाले की खांदे आणि पाठीचा कणा यत असणार्या तराजूसारख्या रचनेचा तोल बिघदतो. ती व्यक्ती असे वर्षानुवर्षे काम करत राहीली की त्याकण्याची वाकडी स्थिती व्हायल लागते. तोअल धळतो. दोन मणक्यामधे सूज यायला लागते. आणि अशी सूज आली की हालचाल बंद होते. ही हालचाल बंद होणे ही शरीराने केलेली संरक्षणाची नैसर्गिक व्यवस्था आहे. पण आपन काय करतो की अशी हालचाल बंद झाली की जबरदस्तीने हालचाल करतो. कारण अशी हालचाल बंद होणे हे परवडण्यासारखे नसते. मग तात्पुरत्या वेदनाशामक औषधे घेऊन काम पुढे सुरू ठेवतो. पण त्याने मूळचे कारन दूर होत नाही. बरे वेदनाशामक औषधांना मर्यादा असतात. ती फार काळ घेता येत नाहीत. आणि मग अशी स्थिती येते की त्या औषधांचा उपयोग होईनासा होतो. हळूहळू वरचा मणका खालच्यावरून सरकायला लागतो, त्यात 'गॅप' पडायला लागते. वेड्या वाकड्या स्थितीमुळे चकतीवर असमतोल दाब पडून ती झिजायला लागते. किंवा ती मागे ओढली जाते आणि माग दुखण्याची न संपणारी मालिका सुरू होते. कधी कधी अतिरेक झाला तर मज्जारज्जूलाही ईजा पोहोचण्याच संभव असतो. स्पर्श, दाब, वेदना यातून निर्माण होणारा दाह हे एक दुष्टचक्र आहे. मग ती व्यक्ती आपल्याला दुखणार नही अशी स्थिती धारण करण्याचा प्रयत्न करते.व त्याने शरीराला वक्रता येते. पुढे पुढे हालचाल मंदावते. कण्याच्या नैसर्गिक वक्रतेत बदल होतो. हालचालींवर बंधने येतात.स्नायूंचा आकार आणि लांबी यात बदल होतो. व शेवटी आपल्या पायवर त्याला उभे राहणे अशक्य होते. आणि मग सर्वसामान्य दृश्य असे दिसते की आता आपण गांभिर्याने यावर विचार करायला लागतो. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते, किंवा उशीर झालेला असतो.आणि हा दु:खद प्रवास शस्त्रक्रियेशी येऊन थांबतो.परंतु अश्या शस्त्रक्रियेनंतरहि दुखणे जाईल याची खात्री डॉक्टर देतीलच असे नाही. आणि मग रूग्ण हतबल होतो.

या दुखःद अवस्थेतून सहिसलामत बाहेर येणे शक्य आहे. त्यासाटी प्रयत्नपूर्वक वेळ देणे आणि बर्‍याच मनोनिग्रहाची गरज आहे. या पुढिल लेखात यावर यशस्वी मात करण्याचे उपाय पाहूया. यात दिनचर्या, औषधे, योगोपचार याचा समावेश असेल.



ॐ तत्सत्



श्रीराम पेंडसे

३ टिप्पण्या: